विशेष प्रतिनिधी
पुणे : रांजणगाव गणपती परिसरात २५ मे रोजी आढळून आलेल्या एका महिला आणि तिच्या दोन लहान मुलांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे गूढ उलगडले आहे. प्रेमसंबंधातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे.
स्वाती केशव सोनवणे (वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) आणि तिची दोन मुले स्वराज (वय २) आणि विराज (वय १) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गोरख पोपट बोखारे (वय ३६, रा. सरदवाडी, ता. शिरूर, मुळ रा. श्रीगोंदा) याला अटक करण्यात आली आहे.
रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला २५ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तीन मृतदेह आढळून आले होते. हे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत होते. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली होती. ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तातडीने सात पथके तयार केली. मृत महिलेच्या हातावरील या गोंदणाच्या (टॅटू) आधारे ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. वाघोली ते राहुरीपर्यंत सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तर १६ हजार ५०० भाडेकरूंची चौकशी करण्यात आली. तसेच चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव एम.आय.डी.सी. येथील कामगारांकडूनही माहिती घेण्यात आली. मात्र, सुरुवातीला मृतदेहांची ओळख पटविण्यात यश आले नाही.
पोलीस अधीक्षक गिल यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी एक अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार अशा एकूण २८ अंमलदारांची सहा पथके तयार करून त्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रवाना करण्यात आले. या पथकांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हरवलेल्या व्यक्तींची माहिती तपासली. बीड जिल्ह्यात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ९ मे रोजी हरवलेल्या महिलेची माहिती मिळाली. या महिलेचे वर्णन मृत महिलेच्या वर्णनाशी जुळत होते. या तपासातून मृत महिला ही स्वाती सोनवणे असल्याची खात्री पटली.
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
पोलिसांनी स्वातीचा पती केशव सोनवणे याच्याकडे चौकशी केली. त्यावर स्वाती तिच्या दोन मुलांसह आळंदी येथे तिच्या आई-वडिलांकडे गेल्याचे पोलिसांना समजले. पतीसोबतच्या भांडणामुळे स्वाती तिची मुले स्वराज आणि विराज यांच्यासह तिच्या बहिणीचा दीर गोरख बोखारे याच्यासोबत २३ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आळंदीहून दुचाकीवरून गेली होती, अशी माहिती समोर आली. स्वातीचे आई-वडील आळंदी येथे मोलमजुरी करतात. त्यांनी स्वाती कुठे आहे याची अधिक माहिती घेतली नव्हती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी गोरख बोखारे आणि मृत स्वाती हे नातेवाईक आहेत. स्वातीची बहीण आरोपीच्या भावाला दिली आहे. स्वाती आणि तिच्या पतीमध्ये नेहमी भांडणे होत असत. गोरख त्यांच्यातील वाद मिटवत असे. याच दरम्यान, गोरख आणि स्वाती यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर स्वाती गोरखकडे लग्नाची मागणी करत होती. परंतु त्याला तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते. २३ मे च्या रात्री आरोपी बोखारे याने आपल्या दुचाकीवरून स्वाती सोनवणे आणि तिच्या दोन्ही मुलांना आळंदीहून घेतले. सरदवाडी येथे जात असताना, रांजणगाव गणपती गावच्या हद्दीतील पुणे-नगर महामार्गालगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीजवळ, खंडाळे गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत त्याने दुचाकी थांबवली. लग्नाच्या मागणीला विरोध म्हणून त्याने स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला ११ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Triple murder case over love affair in Ranjangaon, woman and her two children burnt to death
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी