Devendra Fadnavis : अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण करू नका, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Devendra Fadnavis  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सर्वांचे लाडके नेते होते. अजित पवारांच्या अपघाती निधनाचे सत्य बाहेर आले पाहिजे असे प्रत्येकालाच वाटत आहे. ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल असा मला विश्वास आहे. यासंदर्भात त्यांचे काही मुद्दे असतील, तर त्यांनी डीजी सेफ्टीकडे पाठवले पाहिजेत. या प्रकरणी डीजी सेफ्टींनी त्यांच्या शंकांचे निरसण केले पाहिजे. एकूणच शंका व्यक्त करणे चुकीचे नाही. फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही हे पाहिले पाहिजे. आपण अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण करणार नाही, या बाबत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सत्य निश्चितच बाहेर येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्याकडील पुरावे तपास यंत्रणांना देण्याचे आवाहन केले आहे. अजित पवार आपल्या सर्वांचे लाडके नेते होते. त्यांच्या निधनाचे सत्य बाहेर यावे असे प्रत्येकाला वाटत आहे. या प्रकरणी योग्य तो तपास सुरू असून, सर्वांनी भारतीय तपास यंत्रणांवर विश्वास दाखवला पाहिजे. रोहित पवारांनीही त्यांच्याकडील पुरावे तपास यंत्रणांना दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.Devendra Fadnavis



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनाविषयी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयावर विस्तृत भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले, मी रोहित पवार काय बोलले हे मी ऐकले नाही. माझ्याकडे जी काही माहिती आहे, त्यानुसार त्यांनी काही प्रेझेंटेशन केले आहे. अजित पवारांच्या मृत्यूविषयी वेगवेगळ्या माध्यमांनी व लोकांनी ज्या शंका उपस्थित केल्यात, त्याच शंका त्यांनी उपस्थित केल्यात.

पुढे म्हणाले, अजित पवार हे आपले महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेतृत्व होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण, सखोल व नीट चौकशी झाली पाहिजे. ही मागणी चुकीची नाही. मीच सर्वप्रथम ही मागणी केली होती. मी या प्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असे सांगितले होते. त्यावर केंद्रीय नागरी उड्डयण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्यासंदर्भातील पत्रही मला पाठवले आहे. आता ही चौकशी सुरू आहे. मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की, यासंदर्भात जी काही चौकशी सुरू आहे ती पूर्ण न होता आपण तर्कवितर्क लढवले तर त्यातून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशात डीजी एव्हिएशन सेफ्टी आहे, ते सर्वात मोठे ऑफिस आहे. देशात आजपर्यंत झालेल्या सर्व अपघातांमध्ये त्यांनीच तपास केला. त्यांचीही चौकशी सुरू आहे. त्याला समांतर सीआयडीचाही तपास सुरू आहे. अजून डीजीसीएचा तपास सुरू आहे. ब्लॅकबॉक्स पूर्णपणे सापडला आहे. जे काही रेयर पार्ट आहेत, ते ही सापडलेत. पायलट व एटीसीमधील कम्युनिकेशन डिजिटाईज असते. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. संबंधित विभागाने अपघात स्थळावरील नमुणे नेले आहेत. त्याची न्यायवैद्यक तपासणी सुरू आहे.

आपण ही चौकशी पूर्ण होऊ दिली पाहिजे. माझे स्वतःचे मत असे आहे की, भारतातील चौकशी यंत्रणांवर कुणीही अविश्वास दाखवू नये. आज भारतातील चौकशी यंत्रणा या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत. अनेक छोट्या देशांत आपल्याकडून चौकशीसाठी अधिकारी बोलावले जातात. ठीक आहे, ते भावनेच्या भरात काही बोलले असतील. पण आपण आपल्या देशाच्या तपास यंत्रणेंवर कधी अविश्वास दाखवत नाही. या प्रकरणातही दाखवण्याचे कारण नाही.

Do Not Politicize Ajit Pawar’s Tragic Death, Appeals Devendra Fadnavis