अंजली दमानिया यांनी काढली नेत्यांच्या अशोक खरात सोबत झालेल्या संभाषणाची फोन कुंडलीच

विशेष प्रतिनिधी

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात याच्या राजकीय कनेक्शनची चर्चा होत असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यातील बड्या नेत्यांची अशोक खरात सोबत झालेल्या संभाषणाची फोन कुंडलीच बाहेर काढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात 17 वेळा तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरातला 177 वेळा फोन केले होते, असा दावा दमानिया यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार व शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे ही वेळोवेळी भोंदू खरातच्या संपर्कात होते, असे दमानिया यांनी म्हटले आहे. Anjali Damania

अंजली दमानिया शुक्रवारी यासंबंधी बोलताना म्हणाल्या, अशोक खरातच्या प्रकरणाची खूप मोठी माहिती माझ्याकडे येत आहे. ती मी माध्यमांनाही देत आहे. पण काही कारणामुळे मी आता चंदीगडला आले आहे. लग्नानिमित्त रविवारपर्यंत मी परत येणार नव्हते, म्हणून मला वाटले की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. मला एक सीडीआरची कॉपी मिळाली आहे. ही कॉपी व्हॉट्सएपवर ज्यांनी पाठवली, त्यांना मी ओळखत नाही. पण मी ती पोलिस महासंचालक व मुख्यमंत्र्यांना पाठवली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनाही मी ही माहिती दिली.

काल दिवसभरात मी माहिती थोडीशी संकलित केली. त्यात मला धक्कादायक माहिती मिळाली. रुपाली चाकणकर आतापर्यंत म्हणायच्या की अशोक खरात हे माझे गुरू आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही माहिती. पण चाकणकरांनी खरातला सुमारे 177 कॉल्स केल्याची माहिती माझ्याकडे आहे. एवढेच नाही तर त्यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांचेही तब्बल 236 कॉल्स खरातला गेले.

अंजली दमानिया म्हणाल्या, प्रस्तुत प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत केवळ फोटो व व्हिडिओ पाहिले. पण शिंदे यांनी अशोक खरातला तब्बल 17 कॉल केल्याची माहिती माझ्याकडे आहे. हे सर्व नॉर्मल फोन कॉल्स आहेत. त्यांच्यात व्हॉट्सएप किंवा इतर माध्यमातून किती कॉल झाले याची माहिती मला नाही. पण 17 पैकी 10 इनकमिंग व 7 आऊटगोईंग कॉल होते. त्यात एकदा दोघांत तब्बल 21 मिनिटांचे संभाषण झाले. ही सगळी माहिती एक जबाबदार नागरीक म्हणून मी यंत्रणांना दिली. माझी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची इ्च्छा होती. त्यामुळे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे. यात माझा दुसरा कोणताही हेतू नाही.



महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशोक खरातसारख्या व्यक्तीशी 17 वेळा फोन करत असतील तर त्यांनी ते कशासाठी केले याचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत. आशिष शेलार यांचाही 1 कॉल आहे. हे सर्व नॉर्मल कॉल्स आहेत. कारण, व्हॉट्सएप कॉल्सची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. या लोकांनी एकमेकांशी नॉर्मल कॉल एवढे केले असतील तर व्हॉट्सएपवरून किती संभाषण केले असेल हे सांगता येत नाही, असे त्या म्हणाल्या.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, प्रस्तुत सीडीआरमध्ये अशोक खरात व तृप्ती खरात यांच्यात सर्वाधिक वेळा बोलणे झाल्याचे नमूद आहे. कुटुंबातील व्यक्तीशी जास्त बोलणे होते, हे आपण समजू शकतो. पण त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर यांचे नाव आहे. त्यांनी सुमारे 33 हजार 727 सेकंद एवढे संभाषण खरातशी साधले आहे. त्यामुळे चाकणकरांना अटक करून त्यांची चौकशी झाली पाहिजे. सर्वप्रथम त्यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक झाली पाहिजे. एवढा वेळ कुणीही आपल्या गुरुशी बोलू शकत नाही. दोघांमध्ये एवढे मोठे संभाषण होत असेल, तर ती काय बोलत होती? याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे.

या प्रकरणात तिसरे नाव दीपक लोंढे यांचे आहे. हे माजी मंत्री दीपक केसरकर यांचे अतिशय जवळचे व्यक्ती आहेत. त्यांचे 189 कॉल्स खरातला झाले होते. त्यांनी 30 हजार 579 सेकंद बोलले होते. ही सर्व माहिती धक्कादायक आहेत. अशोक खरातला देश व परदेशातून फोन यायचे. त्याला कतार, यूएई, ऑस्ट्रेलिया, यूएस व्हर्जिन आयलँड, ओमान, ख्रिसमस आयलँड येथूनही खरातला फोन येत होते. ही सर्व माहिती एसआयटीला दिली आहे. त्यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे जी-जी माहिती येईल, ती माहिती मी यंत्रणेला देईल, असे दमानिया म्हणाल्या

Anjali Damania Exposes Call Records of Leaders Linked to Ashok Kharat

महत्वाच्या बातम्या