Nana Patole : सैफ अली खान हल्ला प्रकरणी सीसीटीव्ही मधील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का? पोलिसांनी खुलासा करण्याची नाना पटोले यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस पटोले म्हणाले की, मुंबईतील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वांद्रे भागात अभिनेत्याच्या घरात हल्ला झाल्याने सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत तसेच गावातील सरपंचही सुरक्षित नाहीत तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? हा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असून निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून सरकार काम करत आहे त्याचासुद्धा हा परिणाम आहे.

सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सैफवरील हल्ला हा हिंदू मुस्लीम नसून तो सुरक्षेचा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, परंतु सत्ताधारी भाजपातील काही लोक त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी भाजपा सरकारनेच सीबीआय चौकशी केली होती, आजपर्यंत सीबीआयने त्यांचा अहवाल दिला नाही. भाजपा सरकार हिंदू सुशांतला न्याय देऊ शकले नाही असेच म्हणावे लागले. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही सत्ताधारी भाजपा धार्मिक अजेंडा राबवत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे पटोले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा युतीने लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करत सर्व भगिणींना प्रति महिना १५०० हजार रुपये दिले पण आता या योजनेचा लाभ चुकीच्या लोकांनी घेतला, या योजनेत त्रुटी आहेत. बांग्लादेशींनीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचा साक्षात्कार सरकारला झाला आहे. योजना सुरु करताना सरकारला त्रुटी दिसल्या नाहीत का?

बांग्लादेशींनी या योजनेचा लाभ घेतला तर हे बांग्लादेश भारतात, महाराष्ट्र आले कसे? केंद्रात मागील ११ वर्षांपासून ५६ इंच छातीवाल्या मोदींचे सरकार आहे. मग मोदी सरकार कमजोर आहे, असे भाजपाला म्हणायचे आहे का? असा प्रश्न विचारून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

Saif Ali Khan attack case? Nana Patole’s demand for disclosure by the police