All Party Delegation : सर्वपक्षीय शिष्टमंडळ जागतिक व्यासपीठावर मांडणार भारताची भूमिका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बांगलादेश संघर्षावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू असताना भारताची बाजू संयुक्त राष्ट्र महासभेत (UN General Assembly) विरोधी पक्षनेते असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी मांडली होती. त्याच धर्तीवर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ (All Party Delegation) जगातील प्रमुख देशांमध्ये जाऊन भारत – पाक संघर्षात भारताची भूमिका मांडणार आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची दहशतवादविरुद्ध लढाई मजबूत करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. भारताने राजनैतिक दृष्टीकोनातून सर्वपक्षीय सात जणांचे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामधले सर्व प्रमुख पक्षातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, सर्वात महत्त्वाच्या क्षणी भारत एकजूट उभा राहतो. सात सदस्यीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख देशांचा दौरा करेल. तिथे दहशतवादाविरोधात भारताच्या धोरण स्पष्ट करेल. राजकारण आणि मतभेद यापेक्षा राष्ट्रीय एकता शक्तीशाली प्रतिक आहे.

भारताचे हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देश आणि इतर प्रमुख देशांचा या महिन्याच्या अखेरीस दौरा करेल. या शिष्टमंडळात काँग्रेसचे शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद, जनता दलाचे संजय कुमार झा, भाजपाचे बैजयंत पांडा, डीएमकेच्या कनीमोई करुणानिधी, शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे , शिंदेसेनेकडून श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमीरातसारख्या देशांचा दौरा करतील. हा परदेश दौरा २२ मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. भारत सरकारचा हा प्रयत्न जागतिक पातळीवर पाकिस्तानकडून पोसला जाणारा दहशतवाद आणि भारताच्या नागरी वस्त्यांवरील हल्ले याची माहिती प्रमुख देशांना देणार आहे.

भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात माझा समावेश होणे याचा मला गर्व आहे. मी ही जबाबदारी विनम्रपणे स्वीकारते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि परराष्ट्र विभागाचे आभार मानते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

१९७१ च्या भारत – पाक संघर्षात अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजे त्यावेळच्या जनसंघाचे नेते , आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे प्रमुख सदस्य होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना पाठवले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी अत्यंत समंजस आणि ठाम भाषेत बांगलादेशमधील मानवी हक्कांचे उल्लंघन, पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार, आणि भारताची संविधानिक व नैतिक भूमिका जगासमोर मांडली. त्यांनी भारत बांगलादेशला मदत का करतो आहे हे स्पष्ट केलं. त्यांच्या भाषणाने जगभरात भारताबाबत सकारात्मक मत तयार होण्यास मदत झाली होती. All Party Delegation

All Party Delegation to present India’s position on global platform