विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारत- पाकिस्तान संघर्षात संपूर्ण जग भारताच्या बाजुने असताना चीनसह तुर्कस्थान आणि अझरबैझान या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यामुळे भारतीयांमध्ये त्यांच्या विषयी प्रचंड संताप निर्माण झाला. यामुळे आता देशातील प्रमुख ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया (TAAI) ने या देशांतील पर्यटनासाठी बुकिंगवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता इस्तंबूल, बाकू या देशांचे पर्यटन विसरावे लागणार आहे.
देशभरातील ३,५०० हून अधिक ट्रॅव्हल एजंट्सच्या या संघटनेने तुर्की (टर्की) आणि अझरबैजानच्या सर्व प्रकारच्या यात्रा बुकिंग आणि त्यांच्या प्रचारावर त्वरित बंदी घातली आहे. यासोबतच, संघटनेने भारत सरकारला या दोन्ही देशांविरुद्ध कठोर प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल अॅडव्हायजरी) जारी करण्याची विनंती केली आहे.
टीएएआयच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड युनिटचे अध्यक्ष हमेंद्र सिंह जादौन यांनी सांगितले की, तुर्की आणि अझरबैजानने सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला आहे. जो भारताच्या हिताच्या विरोधात आहे. याच कारणामुळे या दोन्ही देशांच्या यात्रांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. ट्रॅव्हल एजंट्स आता केवळ नवीन बुकिंग टाळत नाहीत. तर ज्या पर्यटकांनी यापूर्वी बुकिंग केली आहे. त्यांनाही त्यांची यात्रा रद्द करण्याचा सल्ला देत आहेत.
गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने मिटला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कराने कुरापती सुरू केल्या. यावर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. दोन्ही देशातील या संघर्षामध्ये जगातील काही देश भारताच्या बाजूने काही पाकिस्तान तर काहींनी तटस्थ भूमिका घेतली होती. पाकिस्तानची बाजू घेणाऱ्यां देशांमध्ये आघाडीवर होता चीन त्यासोबत तुर्की,अझरबैजान आणि कतार यांचा देखील समावेश होता. पाकविरुद्धच्या संघर्षात भारताने त्यांना योग्य धडा शिकवला आहे. यात चीनकडून देण्यात आलेल्या लष्करी मदतीची पोलखोल झाली. आता भारताच्या लिस्टवर पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांचा समावेश आहे.
विश्वासघात पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत ज्यांनी त्यांची मदत केली यात तुर्की आणि अझरबैजान यांचा समावेश होता. पहलगाम सारखा हल्ला झाल्यानंतर देखील पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या या दोन देशांनी हा विचार नाही जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा भारताने मदत पाठवली होती. मग ती करोनाच्या काळात असो की इतर वेळी. तुर्कीने तर पाकिस्तानला ड्रोन देकील पाठवले होते.
तुर्कीची अर्थव्यवस्था पर्यटनाव अवलंबून असून दरवर्षी ३ लाखांहून अधिक भारतीय पर्यटक त्यांच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावतात. अझरबैजानची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.आता या दोन देशांविरुद्ध मोदी सरकार कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहे. या देशांकडे जाणारी विमान उड्डाणे थांबवणे, पर्यटन कंपन्यांवर दबाव आणणे यासारख्या उपायांचा विचार केला जाऊ शकतो.