रेल्वे रुळ बनणार सौरऊर्जेचे अक्षय स्त्राेत्र, वाराणसीत देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प

विशेष प्रतिनिधी

वाराणसी : भारतीय रेल्वेने पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेकडे मोठी झेप घेत वाराणसीत देशातील पहिली रुळांमधील सौर पॅनेल योजना सुरू केली आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW) द्वारे रुळांमध्ये बसविण्यात आलेली ही काढता येणारी सौर पॅनेल प्रणाली भारतीय रेल्वेच्या नेट-झिरो एमिशन उद्दिष्टाकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यमुळे सुमारे एक लाख २० हजार किलाेमीटर लांबीचे रेल्वे रुळ हे सौरऊर्जेचे अक्षय स्त्राेत्र बनणार आहेत. Railway track

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रायोगिक प्रकल्पात 70 मीटर लांबीचे सौर पॅनेल्स बसविण्यात आले आहेत. यात एकूण 28 पॅनेल्स असून 15 केडब्ल्यूपी इतकी वीज निर्मिती क्षमता आहे. ही प्रणाली स्थानिक तंत्रज्ञानाने डिझाइन केली असून वर्कशॉप लाइन क्रमांक 19 मध्ये रुळांदरम्यान बसवली आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीत कोणताही अडथळा आलेला नाही.

“हे सौर पॅनेल्स टिकाऊ, कार्यक्षम असून काढता येण्यासारखे आहेत. त्यामुळे देखभाल करणे किंवा ऋतूनुसार बदल करणे सोपे जाते,” असे रेल्वे मंत्रालयाने एक्स (पूर्वी ट्विटर) वरून सांगितले. प्रत्येक पॅनेलची लांबी 2278 मिमी, रुंदी 1133 मिमी, उंची 30 मिमी असून वजन 31.83 किलो आहे. यात 144 अर्ध-काप मोनो क्रिस्टलाइन PERC बायफेशियल सेल्स असून मल्टी बस बार डिझाइन आहे. मॉड्यूल कार्यक्षमता 20.15% असून 602 Wp ऊर्जा क्षमता आहे.

भारतीय रेल्वेकडे सुमारे 1.2 लाख किमी इतके रेल्वे रुळांचे जाळे आहे. रुळांदरम्यान उपलब्ध जागेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्मिती करण्याची संधी आहे. योजनेसाठी जमिनीचे अधिग्रहण करण्याची गरज नाही, ही मोठी जमेची बाजू मानली जात आहे. एका किलोमीटरमध्ये दरवर्षी सुमारे 3.5 लाख युनिट्स वीज निर्मितीची क्षमता या योजनेत आहे. भारतीय रेल्वेने रुळांवर थेट सौरऊर्जा प्रणाली बसवून शाश्वत पद्धतीकडे वाटचाल सुरू केली आहे. 2030 पर्यंत नेट-झिरो उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. वाराणसीतील हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास देशभरातील इतर ठिकाणीही ही योजना राबवली जाण्याची शक्यता आहे

Railway track to become Solar Energy Renewable Energy Zone, first pilot project in the country in Varanasi

महत्वाच्या बातम्या