भारताची सात पथके मांडणार पाकिस्तानचे नापाक कारनामे जगासमोर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या धर्मांध प्रचाराला उत्तर देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भाजपची बाजू मांडण्यासाठी सात पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मुस्लिम नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे, हे नेते आता पाकिस्तानचे नापाक कारनामे जगासमोर आणणार आहेत.

भारतातील दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तान असून त्यांच्याविरोधात भारतीय सैन्याने “ऑपरेशन सिंदूर” राबवले. या ऑपरेशननंतर भारताची बाजू प्रमुख देशांसमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काँग्रेसचे नेते आणि संसदेच्या परराष्ट्रविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांच्या नेतृत्त्वात हे शिष्टमंडळ जाणार आहे. पुढील आठवड्यामध्ये शिष्टमंडळ अमेरिका, युरोप, आणि आखाती देशांना भेट देण्याची शक्यता आहे. 51 नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश करण्यात आला आहे. हे शिष्टमंडळा 32 देशांचा दौरा करणार आहेत. यात भारताची दहशतवादविरोधी भूमिका जगासमोर मांडणार आहेत.

पहिले शिष्टमंडळाचे नेतृत्त्व बैजयंता पांडा करणार आहेत. यामध्ये निशिकांत दुबे, फंगनन कोन्याक, रेखा शर्मा, एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी, सतनाम संधू, माजी परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला आणि माजी मंत्री गुलाम नबी आझाद यांचा समावेश असणार आहे. हे शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवैत, बहरीन आणि अल्जारिया या देशांचा दौरा करणार आहे.

दुसरे शिष्टमंडळ भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वात असेल. यामध्ये दग्गुपाती पुरंदेश्वरी, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, गुलाम नबी खटाना, अमर सिंह, समिक भट्टाचार्य, माजी उच्चायुक्त पंकज सरन, आणि माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ यूके, फ्रान्स, जर्मनी, यूरोपीय संघ, इटली आणि डेनमार्क येथे दौरा करणार आहेत.

तिसरे शिष्टमंडळ जनता दल (संयुक्त) नेते संजय झा यांच्या नेतृत्त्वात सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशाचा दौरा करणार. या शिष्टमंडळात काँग्रेस नेते माजी मंत्री सलमान खुर्शीद, माजी उच्चायुक्त मोहन कुमार, हेमांग जोशी, खासदार जॉन ब्रिटास, बृज लाल, यूसुफ पठान आणि अपराजिता सारंगी यांचा समावेश आहे.

चौथ्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे करणार आहे. यामध्ये माजी उच्चायुक्त सुजान चिनॉय, माजी मंत्री एसएस अहलूवालिया, मनन कुमार मिश्रा, सस्मित पात्रा, अतुल गर्ग, ईटी मोहम्मद बशीर आणि बांसुरी स्वराज यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ सिएरा लियोन, कांगो, लायबेरिया, आणि यूएई या देशांमध्ये जाणार आहे.

पाचवे शिष्टमंडळ हे शशि थरूर लीड करतील. यामध्ये माजी राजनयिक तरनजीत संधू, तेजस्वी सूर्या, मिलिंद देवरा, भुवनेश्वर कलिता, शशांक मणि त्रिपाठी, जीएम हरीश बालयोगी, सरफराज अहमद आणि शांभवी चौधरी यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गुयाना, कोलंबिया आणि ब्राझील या देशांमध्ये जाणार आहे.

सहावे शिष्टमंडळ खासदार कनीमोझी यांच्या नेतृत्वात स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लातविया आणि रशियाला जाणार आहे. या शिष्टमंडळात जावेद अशरफ, माजी उच्चायुक्त मंजीव पुरी, अशोक कुमार मित्तल, प्रेम चंद गुप्ता, बृजेश चौटा, मियां अल्ताफ अहमद आणि राजीव राय यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृ्त्त्वात सातवे शिष्टमंडळ इराण, कतार, इथियोपिया आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत. खासदार सुळेंसोबत माजी उच्चायुक्त सैयद अकबरुद्दीन, माजी मंत्री मुरलीधरन, आनंद शर्मा, लावु श्रीकृष्ण देवरायलू, अनुराग ठाकुर, मनीष तिवारी, विक्रमजीत साहनी आणि माजी मंत्री राजीव प्रताप रूडी यांचा समावेश आहे.

Seven Indian teams will present Pakistan’s nefarious activities to the world

महत्वाच्या बातम्या