विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यात जे काही घडले असे चमत्कारिक आहे, सर्वांना धक्का बसला. या घटनेच्या खोलात गेले पाहिजे. या घटनेमागचा सूत्रधार कोण, हे तात्काळ शोधून काढलं पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकार यात खोलात जात नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या घटनेच्या खोलात गेले पाहिजे. या घटनेमागचा सूत्रधार कोण, हे तात्काळ शोधून काढलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
पवार म्हणाले, सरपंचाची हत्या झाली, ज्यांनी 15 वर्ष त्यांनी लोकांसाठी काम केलं. हा अतिशय गंभीर विषय आहे, याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी लोकसभा अधिवेशनात खासदारांनी हा प्रश्न उचलून धरला. गृहमंत्र्यांना भेटले आणि न्याय द्यावा असे मांडले. मी त्यांच्या सभागृहात नाही पण त्यांचे भाषण ऐकत होतो. सुत्रधार कोण याच्या खोलात गेलं पाहिजे. वस्तूस्थिती समोर आली पाहिजे विधानसभेत बीडचे आमदार क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न मांडला. अन्याय झाला आहे. मुख्यमंत्री यांनी आश्वासन आणि रक्कम दिली. मात्र कुटुंबाचे दुःख जावू शकत नाही.याच्या खोलात जावून जो सुत्रधार कोण आहे ते पाहावं लागेल . दहशतीचे वातावरण आहे याला आपण सर्व जण तोंड देवू.
महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये अशी गोष्ट घडतेय ही आपल्याला न शोभणारी आहे असे सांगून पवार म्हणाले, मी खात्री देतो जे दुःखी आहेत त्यांच्यासोबत आम्ही सर्व आहोत. ही स्थिती दुरुस्त कशी होईल हे पहावं लागेल.देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो, पूर्ण शिक्षण आम्ही करू कुटुंबाला आधार देवू. तुम्ही एकटे नाही आम्ही सर्व आहोत. जे झालं ते परत आणू शकत नाही पण धीर देवू शकतो, ते काम आपण सर्व करू