Chandrashekhar Bawankule: वक्फ विधेयकाला विरोधामुळे नाराजी, ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडण्याचे बावनकुळे यांचे संकेत

विशेष प्रतिनिधी

Mumbai News: वक्फ सुधारणा विधेयकाबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे काही पदाधिकारी आणि नेतेमंडळी नाराज झाली आहे. त्यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे फोन येऊ लागल्याचा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.

लोकसभेत बुधवारी (ता. 2 एप्रिल) वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. त्यावर 12 तास चर्चा होऊन बहुमताने हे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. पण, यावेळी शिवसेना ठाकरे गटाने वक्फच्या दुरुस्ती विधेयकाला विरोध केला. याचा मोठा फटका भाजपला बसणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, मी कालही सांगितले होते की, बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहे. आता तर त्यांनी काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला आहे. मतांचे लांगूलचालन करणे, त्याकरिता आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेऊन उद्धव ठाकरेंच्या लोकांनी विरोधात मतदान केले आहे.

पण आता ठाकरेंच्या शिवसेनेत जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहेत. सकाळपासून आमच्या पक्षात (भाजपामध्ये) पक्ष प्रवेश करण्याचे मेसेज आले आहेत. त्यामुळे मंगळवारी हे पक्षप्रवेश घेण्यात येणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातील लोकं अस्वस्थ झालेली आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकाचा विरोध करणे, म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केला आहे, तो या महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान आहे, असा आरोप करून बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही. तर लोकांनी लोकसभेत ठाकरेंच्या ज्या खासदारांना निवडून दिले, त्यांना का निवडून दिले, ती आमची चूक झाली, असे लोकांना नक्कीच वाटत असेल. त्यामुळे आता जनता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून देणार नाही. कारण वक्फ दुरुस्ती विधेयकाचा विरोध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.

Discontent due to opposition to Waqf Bill, Bawankule hints that Thackeray group will face split again

महत्वाच्या बातम्या