विशेष प्रतिनिधी
मुंबई : जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी, अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात, असे उत्तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी दिले.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर शिवसेनी ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, पाच तारखेच्या विजयाचा हँगओव्हर अजून उतरला नाही, लोक आजही त्या विजय उत्सवाची चर्चा करत आहेत. महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहत होती. योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात भाजपा आणि शिंदे गटाच्या लोकांना वाटत होते की युती कशी होते ते पाहतो हे आताही म्हणत आहेत मात्र, हे आव्हान परप्रांतीयांकडून नाही,कसे येतात पाहतो? म्हणजे तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करत आहात का?
संजय राऊत म्हणाले, एका विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र विजय दिवसाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीने अशी विधाने करू नयेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केले पाहिजे. मराठी भाषेच्या लढ्यासाठी आंदोलन करणाऱ्यां कार्यकर्त्यांची पहलगाम हल्ल्याच्या अतिरेक्यांशी तुलना करणे, त्यांना अतिरेकी ठरवणे, हे चित्र काय सांगत आहे? सरकार आणि सरकारचे माणसांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहेत. त्यांना मराठी भाषा या राज्यांमध्ये अभिमानाने झळकलेली नको. त्यांना मराठीचा वैभव आणि गौरव हवा, असे वाटत नाही आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना पहलगामच्या अतिरेक्यांशी करत आहेत.
आमच्याकडून आम्ही सातत्याने मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम असणार आहे. मराठी माणसाच्या मनातल्या भावना किंवा जो संताप आहे त्या संतापाला वाट करून देण्याचे काम सुद्धा आम्ही करत आहे. जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंबावर आणि मराठी माणसाच्या एकजूटी विषयी आहे. त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे. तीच भूमिका राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. दोन्ही बाजूचे तळागाळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करत आहेत, एकत्र आंदोलन करत आहेत. आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत, मिळून काम करत आहेत. महाराष्ट्रात हे चित्र कालपर्यंत फार दुर्मिळ होतं, आज जर ते दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये, असा इशारा राऊत यांनी दिला.
राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणतात. पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा क्रांतीची ठिणगी पडते. 1857 चं बंड त्यातूनच झालं. 1978 साली आणीबाणीनंतर जी सत्ता पालट झाली, ती अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाली, रुदालीतून झाली. फडणवीसांनी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांचे राजकीय ज्ञान अलीकडच्या काळात कच्चं होत आहे. त्यांना शिकवणीची गरज असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत अस राऊत म्हणाले.