विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्यांच्या तोंडामध्ये कोणीतरी शेण कोंबलं असेल आणि त्या भीतीपोटी ते काहीतरी उगाळत असतील तर तुम्ही काय करणार? असा प्रतिहल्ला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाच्या वक्तव्यावर केला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जाेरदार हल्लाबाेल केला हाेता. उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या शिवसेनाप्रमुखांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? शिवसेनाप्रमुखांचे निधन कधी झाले? त्यांची बॉडी किती दिवस ‘मातोश्री’त ठेवली होती? शिवसेनाप्रमुखांच्या हाताचे ठसे घेतल्याची चर्चा ‘मातोश्री’त होती. परंतु ठसे कशासाठी घेतले होते? असे सवाल त्यांनी केले हाेते.
यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, असे वक्तव्य म्हणजे बाळासाहेबांशी बेईमानी आहे.बाळासाहेबांच्या आजारपणात मी मातोश्रीवर होतो. शेवटपर्यंत आम्ही तिथे होतो. आम्हाला माहीत आहे तिथे काय घडले. पण यांच्या तोंडामध्ये कोणीतरी शेण कोंबलं असेल आणि त्या भीतीपोटी ते काहीतरी उगाळत असतील तर तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन आता एक दशक लोटत आहे. शिवसेना प्रमुखांना आता 100 वर्ष होत आहेत. त्यामुळे आता अशी वक्तव्य करणं म्हणजे तुम्हा आम्हाला मोठं करणाऱ्या बाळासाहेबांशी बेईमानी करण्यासारखे आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. मी हे विधान जबाबदारीने करतो आहे. मी हे फार मोठं विधान करतो आहे,” असे रामदास कदम त्यांच्या भाषणात काल म्हणाले. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर सध्या आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता?. त्यांचं अंतर्गत काय चाललं होतं? असा सवालही कदम यांनी उपस्थित केला हाेता.