Raj Thackeray : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राज ठाकरे म्हणाले इगो नाही, कठीण नाही, फक्त इच्छेचा प्रश्न

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय ठरलेला प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरामुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “एकत्र येणं कठीण नाही, फक्त इच्छेचा प्रश्न आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, मतभेद फारच किरकोळ वाटतात. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि त्याच्या हितासाठी सर्व मराठी नेत्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “हा विषय केवळ माझ्या इच्छेचा नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या इच्छेवर अवलंबून आहे. मी माझा इगो अशा लहानसहान गोष्टीत आणत नाही. एकत्र येणं शक्य आहे, फक्त दोघांमध्ये तीच भावना हवी.”

उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा एकत्र येण्याबाबत विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, “मी शिवसेनेत असताना उद्धव बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण त्यांच्याच मनात मी त्यांच्यासोबत काम करावं ही भावना होती का, हा खरा प्रश्न आहे.”

शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं की, “एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतून बाहेर पडणं आणि माझं बाहेर पडणं यात मोठा फरक आहे. तेव्हा आमदार माझ्याकडेही आले होते. पण माझा स्पष्ट निर्णय होता – मी बाळासाहेबांशिवाय कोणाच्या हाताखाली काम करणार नाही.”

सध्या ठाकरे गट किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून या वक्तव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र राज ठाकरे यांच्या या भाष्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊ शकतात का, यावर चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला आहे.

Will Thackeray brothers come together again? Raj Thackeray said no ego, no difficulty, just a question of will

महत्वाच्या बातम्या