विशेष प्रतिनिधी
पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या राजकीय लागेबांध्यांबाबत चर्चेमुळे राजकारणातील गुन्हेगारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. थेट परखड बाेलण्यासाठी प्रसिध्द असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरून कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. तुमचाच हात एखाद्या गैरप्रकरणात खराब झाला असेल, तर तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, आणि आमच्याकडून ते होणारही नाही, असे पवारांनी ठणकावून सांगितले.
पुण्यातील खडकवासला मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार बाेलत हाेते. गुंड निलेश घायवळ आणि त्याचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे.
अजित पवार म्हणाले, पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं, तुमच्यावर अन्याय झाला तर मी सर्वस्व पणाला लावीन; पण तुमचाच हात एखाद्या गैरप्रकरणात खराब झाला असेल, तर तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, आणि आमच्याकडून ते होणारही नाही.” मागच्या काळात मी काहींना पक्षप्रवेश दिला होता. त्यात आजम पानसरे यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. चुकीच्या व्यक्तीला प्रवेश दिल्याचं उमजताच मी लगेच संध्याकाळी त्याला पक्षातून काढून टाकलं. त्यामुळे प्रत्येकाला माझा स्वभाव माहित आहे.
निलेश घायवळ प्रकरणावर पवार म्हणाले,“या प्रकरणात मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे, कुणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, जर त्याने कायदा हातात घेतला किंवा नियमांचं उल्लंघन केलं, तर त्याच्यावर कठोर कारवाई करा. सचिन घायवळ यांच्या बंदुकीच्या परवान्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केली होती, मात्र तरीही त्यांना परवाना दिला नसल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितले. पुणे असो किंवा इतर कुठेही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मी त्यात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही.