विद्यार्थ्यांवर कुणालाही हात उचलू देणार नाही, अमित ठाकरे यांची ठाम भूमिका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जोपर्यंत विद्यार्थी रस्त्यावर आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आता विद्यार्थ्यांवर कुणालाही हात उचलू देणार नाही आणि त्यांच्यावर केसेसही होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मांडली.

नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आम्हीही ठाम आहोत असे ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, २६ तारखेला मुंबईत होणाऱ्या महामोर्चाचे नियाेजन सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या या आंदोलनाचा मुख्य चेहरा केवळ विद्यार्थीच असणार आहेत. या आंदोलनाला गालबोट लागू नये आणि यामध्ये कोणतेही घुसखोर शिरू नयेत, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. याच नियोजनासाठी आज एक महत्त्वाची बैठकही बोलावण्यात आली होती.



अमित ठाकरे म्हणाले, सरकारने आता ३ मागण्या मान्य केल्या आहेत, त्याबद्दल देशाचे अभिनंदन. पण, जर या मागण्या आधीच मान्य केल्या असत्या, तर या तीव्र आंदोलनाची गरजच पडली नसती. दिल्लीत मुलींचे कपडे फाडले गेले, मुलांवर अमानुष लाठीचार्ज झाला. शिवतीर्थावर दररोज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमत आहेत, आम्ही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरणार आहोत,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, आता विद्यार्थ्यांवर कुणालाही हात उचलू देणार नाही आणि त्यांच्यावर केसेसही होऊ देणार नाही.

अमित ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान आता यावर बोलत आहेत, याचाच अर्थ कुठेतरी त्यांच्या मनातही भीती आहे की हा देश पेटून उठला आहे. हे आंदोलन म्हणजे कुठल्या एका राजकीय पक्षाचे आंदोलन राहिलेले नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला आहे. त्यामुळे जोपर्यंत विद्यार्थी रस्त्यावर आहे, तोपर्यंत आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाच’ असे सांगत विद्यार्थ्यांच्या या न्याय्य हक्काच्या लढाईत मनसे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.

Will Not Let Anyone Lay a Hand on Students: Amit Thackeray

महत्वाच्या बातम्या