Yogi Adityanath : दंगलखोरांना दंडूकच उत्तर, योगी आदित्यनाथांचा ममता सरकारवर घणाघात, वक्फ दुरुस्ती कायद्याचे केले कौतुक

विशेष प्रतिनिधी

लखनऊ :  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी 16 एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या हिंसाचारावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “दंगलखोरांना शब्द नव्हे, तर दंडूकच उत्तर असतो, कारण ‘लाठ्यांचे भुते बोलण्याने ऐकत नाहीत’,” अशा कठोर शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.Yogi Adityanath

हरदोई जिल्ह्यातील माधोगंज येथे विजय दिन कार्यक्रमात बोलताना योगी म्हणाले, “बंगाल सध्या जळतंय. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शांत आहेत. त्या दंगलखोरांना ‘शांतीचे दूत’ म्हणतात. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यांनी अशांतता पसरण्याची मोकळीक दिली आहे. संपूर्ण मुर्शिदाबाद जिल्हा गेल्या आठवड्यापासून पेटलेला आहे, तरी राज्य सरकार गप्प आहे. ही अराजकता थांबवली गेली पाहिजे.”

योगी आदित्यनाथ म्हणाले, “फक्त शब्दांनी काही होत नाही, कायदाचं राज्य प्रस्थापित करायचं असेल तर कडक कारवाई गरजेची आहे. उत्तर प्रदेशात 2017 पूर्वी वारंवार दंगे होत होते. पण आम्ही ‘दंडा’चा वापर करून ते थांबवले. तोच मार्ग बंगालमध्येही आवश्यक आहे.”

योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे वक्फ दुरुस्ती कायदा मंजूर केल्याबद्दल आभार मानले. “हा कायदा मंजूर झाल्यामुळे गरिबांची जमीन लुटण्याचे प्रकार थांबले आहेत. या जमिनी आता रुग्णालय, शाळा, घरे आणि विद्यापीठ उभारण्यासाठी वापरण्यात येतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

योगी म्हणाले, “जे बांगलादेशातील हिंदूविरोधी हिंसाचाराचं समर्थन करतात, त्यांनी भारतात राहण्याचं कोणतंही नैतिक अधिकार नाही. त्यांना भारताच्या भूमीवर राहण्याची गरजच काय?”

मुर्शिदाबादमध्ये वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाने सामूहिक हिंसाचाराचे रूप घेतले. या मुस्लिमबहुल भागात 3 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक हिंदू कुटुंबांवर हल्ले, बलात्काराच्या धमक्या, लुटमार आणि घरातून हाकलून देण्याचे प्रकार घडले. त्यामुळे अनेक हिंदू कुटुंबांनी स्थलांतर केलं.

या परिस्थितीत, भाजप नेत्यांच्या याचिकेनंतर कोलकाता उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती करण्याचे आदेश दिले. सध्या या भागात केंद्रीय दलांचे नियमित गस्तीद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयाचे स्वागत करत “तेथील हिंदू अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक पाऊल” असल्याचे म्हटले.

 

Batons are the answer to rioters, Yogi Adityanath attacks Mamata government, praises Waqf Amendment Act

महत्वाच्या बातम्या