UK MP Bob Blackman : पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली तरी आम्ही सोबत , ब्रिटिश खासदाराचा भारताला पाठिंबा

विशेष प्रतिनिधी

लंडन : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारताने कोणतीही कारवाई केली तरी आम्ही सोबत आहोत. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर लष्करी कारवाई केली तरी आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमॅन (UK MP Bob Blackman) यांनी दिले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत अनेक खासदार, मंत्री व भारतीय वंशाचे नागरिक एकत्र आले. या वेळी ब्रिटनच्या राजकीय नेत्यांनी भारतासोबत एकजूट दाखवली आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या कार्यक्रमाला भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी, केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट , तसेच यूकेचे खासदार बॉब ब्लॅकमन आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी भारताचे समर्थन करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने जे योग्य वाटेल ते पाऊल उचलावे, जरी ती लष्करी कारवाई असली तरी, त्याला आपले पूर्ण समर्थन असेल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, कोणताही दहशतवादी हल्ला हा संपूर्ण मानवतेवरील हल्ला असतो. पहलगाम येथे झालेला हल्ला हा धार्मिक द्वेषचे दर्शवतो आणि हे अजिबात सहन केले जाऊ शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, मी हा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित केला आणि सरकारला भारताला ठोस पाठिंबा देण्याचे आवाहन केले. भारत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध जी काही कारवाई करेल त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. दहशतवाद्यांना कायद्यासमोर उभे करता येत नसेल तर, तर त्यांना संपवले पाहिजे. भारताने नियंत्रण रेषा ओलांडून जरी कारवाई केली तरीही ब्रिटनमधील सर्व राजकीय पक्ष भारतासोबत उभे राहतील, अशी मला आशा आहे.

बॉब ब्लॅकमन हे इंग्लंडमधील हॅरो ईस्टचे कंझर्व्हेटिव्ह खासदार आहेत. त्यांना भारताचा पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. आपल्या काश्मीर भेटीची आठवण सांगताना ब्लॅकमन म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी काश्मीर खोऱ्याला भेट दिली होती आणि खोऱ्याचे सौंदर्य अजूनही माझ्या मनात कोरले आहे. या खोऱ्यात पर्यटन वाढू नये, अशी इच्छा दहशवाद्यांची आहे, परंतु आम्ही त्यांना तसे करू देणार नाही.

ब्रिटनच्या मंत्री वेस्ट आपल्या भाषणात म्हटलं, “पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करत आहे. या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांसोबत व भारतातील नागरिकांसोबत मी आहे. यूके आणि भारत यांच्यातील संबंध सशक्त करणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी या घटनेला वैयक्तिक दु:ख मानले आहे. ब्रिटनच्या दोन्ही प्रमुख पक्षांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या समर्थनाची भावना व्यक्त केली आहे. हाऊस ऑफ लॉर्डस आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या हल्ल्याच्या निषेधार्थ दोन्ही बाजूंनी गंभीर शब्दांत भावना व्यक्त करण्यात आल्या. अशा संकटसमयी आपण एकत्र येणे आवश्यक आहे, केवळ न्याय मिळवण्यासाठीच नव्हे, तर शोकसंतप्त कुटुंबांना आधार देण्यासाठीही. शांततेसाठी प्रार्थना करण्याचा हा संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. आम्ही भारतासोबत आहोत.

दोराईस्वामी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ” मुंबई हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा नागरी हल्ला आहे. या हल्ल्याचा उद्देश जम्मू-काश्मीरमधील सामान्य जनतेला घाबरवणे, त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करणे आणि पर्यटकांना या सुंदर प्रदेशापासून दूर ठेवणे हाच आहे. या हल्ल्याद्वारे भारताच्या विकासप्रवासात अडथळे आणण्याचा, धर्म, जात, भाषेच्या आधारावर देशाची एकता खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण ही भारताची एकता तुटणारी नाही. आम्ही १.४ अब्ज लोकांचे राष्ट्र आहोत, जे एकत्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. इतिहासाने दिलेल्या आणि स्वतःच्या चुका स्वीकारत, आम्ही कोणत्याही हिंसक प्रवृत्तीमुळे विचलित होणार नाही.

Even if You enters Pakistan and takes action against terrorists, we will be with you ,UK MP Bob Blackman supports India

महत्वाच्या बातम्या