Operation Sindoor भारताची पाकिस्तानवर जोरदार कारवाई : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिलं आहे. बुधवारी (७ मे) मध्यरात्री भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदलाने एकत्रितपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करत त्यांना धुळीस मिळवलं. या कारवाईने संपूर्ण देशात उत्साहाची लाट उसळली असून, ही कारवाई १९७१ युद्धानंतरची पहिली अशी संयुक्त लष्करी मोहीम ठरली आहे.

गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांचे प्रमुख तळ लक्ष्य करण्यात आले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे समोर आलं होतं. कारवाईदरम्यान बहुतेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता आहे.

हल्ल्याची ठिकाणं आणि दहशतवाद्यांची संख्या (अंदाजे): बहावलपूर : २५० पेक्षा अधिक, मुरिदके : १२० पेक्षा अधि, मुझफ्फराबाद : ११० ते १३०, कोटली : ७५ ते ८०, सियालकोट : सुमारे १००, गुलपूर : ७५ ते ८०,भींबर : सुमारे ६०, चक अमरू : ७० ते ८० भारतीय लष्कराने आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून या कारवाईची अधिकृत घोषणा करत “Justice is Served” असा स्पष्ट संदेश दिला. देशभरातून या धाडसी पावलाचं जोरदार समर्थन होत असून, जवानांच्या शौर्याला सलाम केला जात आहे.

दरम्यान, भारत सरकारने अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, युएई आणि रशिया यांसारख्या प्रमुख देशांशी संपर्क साधत या कारवाईची माहिती दिली असून, ही कारवाई आत्मरक्षणाच्या आणि दहशतवादविरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद साधत पारदर्शकतेचे भानही ठेवले आहे.

या कारवाईमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला असून, पाकिस्तानने या कारवाईचा निषेध करत त्याला आक्रमण ठरवले आहे. पाकिस्तानकडून नागरी हानीचा दावा करण्यात आला असून, काही जागतिक नेत्यांनी दोन्ही देशांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

India takes strong action against Pakistan: Nine terrorist camps destroyed in ‘Operation Sindoor’

महत्वाच्या बातम्या