विशेष प्रतिनिधी
अमरावती : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणाले. Bachchu Kadu
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यांनी परवापासून थेट अन्नत्याग करण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांना सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे सांगत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान राखत आपले अन्नत्याग उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. उद्याचे चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बच्चू कडू उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत नाही, तर स्थगित करत आहोत. सरकारने आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर 2 ऑक्टोबर रोजी आपण थेट मंत्रालयात शिरू. आपण सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा चकवा देऊ. सांगू नागपूरला व जाऊ मुंबईला. यांना आपण एकदा छत्रपतींचा गनिमी कावा दाखवू.
मुख्यमंत्री सध्या आम्हाला तारीख सांगण्यास तयार नाहीत. पण आम्ही त्यांना 2 ऑक्टोबरची तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. अन्यथा आम्ही त्यांना माफ करणार नाही. आत्ता आपण हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करत आहोत. मी कार्यकर्त्यांचा अंत पाहू शकत नाही. ते माझ्याशिवाय उठण्यास तयार नाहीत. एक आज्जी तर ऐकण्यास तयारच नव्हती. सर्वच जातीधर्माच्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे मी आभार मानतो. हे यश आमचे नव्हे तर इथे येणाऱ्या सर्वांचे यश आहे.
मी आता महाराष्ट्रभर दौरे करेन. हे आंदोलन अधिक मजबूत करेन. तुम्ही कोणत्याही पक्षात राहा. कोणत्याही नेत्याचा मानसन्मान करा. पण शेतकऱ्याच्या मुद्यावर एकजूट व्हा, असे आवाहनही बच्चू कडू यांनी यावेळी जनतेला केले.
मी पाणीही सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण, हे सरकार तोपर्यंत मानणार नव्हते. पण डॉक्टरांनी माझ्या लिव्हरचा प्रॉब्लेम सुरू झाल्याचे सांगितले. उद्या कदाचित दवाखान्यात भरतीही व्हावे लागेल. त्यामुळे अशा सर्व गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागे घेत आहोत. आपण 2 ऑक्टोबरला पुन्हा नव्या दमाने हे आंदोलन सुरू करू, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी, बच्चू कडू यांनी सरकारला सोमवारपासून पाणी सोडण्याचा इशारा दिला होता. खरे तर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता. पण सरकारने आता यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. पण या समितीचाी अहवाल केव्हा येणार? कोणत्या तारखेला कर्जमाफीची घोषणा करणार? हे काहीही स्पष्ट नाही. या मुद्यावर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. या बैठकीत एखादा निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम राखावा. कोणतेही अनुचित कृत्य करू नये. पण माझी मानसिकता आहे की, 16 तारखेपासून पाणीही सोडून द्यावे, असे बच्चू कडू म्हणालेत.
दुसरीकडे बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपोषणामुळे काय स्थिती होते हे पाहण्यासाठी एक दिवसाचा उपवास करण्याचे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस उपवास करावा. त्यानंतर आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पाहावे. यापुढे बच्चू कडू यांना अन्नत्याग करण्यास फशी पाडले, तर खबरदार. प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग आंदोलन करण्यास भाग पाडेल हा माझा शब्द आहे, असे त्या म्हणाल्या.
बच्चू कडू पाचव्यांदा अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना सुळावर देण्यासाठी त्यांच्या आईने त्यांना जन्माला घातले आहे का? कोणत्याही शासनाने गेंड्याची कातडी बाजूला ठेवून मातीतल्या माणसांचे कल्याण करावे. भाजप असेल किंवा काँग्रेसचे सरकार असेल सर्वांनी शेतकरी व दिव्यांग यांच्यासाठी जातपात व स्वतःचा स्वार्थ दूर ठेवावा, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या होत्या.
तत्पूर्वी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. पण कडू यांनी त्यांचे आवाहन धुडकावून लावत आपण आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. कडू मागील 7 दिवसांपासून गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6 हजार रुपये मानधन आदी 17 मागण्या त्यांनी केल्या आहेत.
Bachchu Kadu’s hunger strike suspended, Uday Samant’s request respected
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी