विशेष प्रतिनिधी
मुंबई : धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झाला नाही, तर या प्रकरणातले इतर स्फोट नाइलाजाने करावे लागतील, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिला आहे. Dhule extortion case
धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 85 लाख रुपयांच्या रकमेसंदर्भात त्यांनी हे पत्र लिहिले आहे. शिंदे गटाचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासाठी ही रक्कम गोळा करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झाला नाही, तर या प्रकरणातले इतर स्फोट नाइलाजाने करावे लागतील, असा इशारा संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महिनाभरापूर्वी माजी आमदार अनिल गोटे यांनी हे प्रकरण समोर आणले होते. त्यावेळी देखील खासदार संजय राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित करत अर्जुन खोतकर यांच्यावर शरसंधान केले होते. हे प्रकरण ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे, त्यामुळे या प्रकरणी ईडीकडे तक्रार देखील करणार असल्याचेही ते त्यावेळी म्हणाले होते. आता यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. Dhule extortion case
राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, आपल्या राज्यातला भ्रष्टाचार विधिमंडळाच्या समित्यांपर्यंत पोहोचला आहे आणि आपण (फडणवीस) फक्त राजकीय मसलती तसेच उद्योग-व्यापारात गुंतून पडला आहात. भ्रष्टाचारी तुरुंगात जातील, एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, असे आपण अधूनमधून सांगत असता, मात्र गेल्या काही वर्षांत आपण भाजपाचे डम्पिंग ग्राऊंड करून भ्रष्टाचारात बरबटलेला सर्व कचरा स्वपक्षात सामील करून घेतला आणि त्यांचे समर्थनही आपण करता, त्यामुळे खरे फडणवीस नक्की कोणते, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारे एक प्रकरण धुळे जिल्हयातील शासकीय विश्रामगृहात घडले. माजी आमदार अनिल गोटे यांनी उघड केलेल्या या प्रकरणात 21 मेच्या मध्यरात्री विश्श्रामगृहाच्या खोली क्र. 102मध्ये 1 कोटी 85 लाखांचे घबाड सापडले. या खोलीतून 3 कोटी रुपये आधीच बाहेर नेले आणि 10 कोटी जालन्यात पोहोचवले. धुळे दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या ‘पीए’च्या खोलीत ही रक्कम होती आणि धुळ्यातील ठेकेदारांकडून अंदाज समितीच्या अध्यक्षांना ‘नजराणा देण्यासाठी खंडणीरूपाने 15 कोटी रुपये जमा करण्यात आले. यामुळे देशभरात खळबळ उडाली.
धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाला तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, विश्रामगृहावर सापडलेले घबाड हे अंदाज समिती अध्यक्षांना ‘नजराणा’ देण्यासाठीच गोळा केले. माझ्या माहितीप्रमाणे धुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून अंदाज समिती अध्यक्षांना देण्यासाठी ही रक्कम गोळा केली. त्या पिशवीवर ‘R’ लिहिले होते. धुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने तोंडी आदेश देऊन शहरी तसेच ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी 10 हजार प्रमाणे 1 कोटी 47 लाख रुपये गोळा केले. ही रक्कम फक्त तीन तासांत गोळा केली. पैसे जमा झाले नाहीत तर ‘समिती’चे सदस्य दुकानांवर रेड टाकतील, असे निरोप देण्यात आले आणि त्यानंतर पैसे जमा केले. याबाबतची अधिक माहिती हवी असेल तर ती मिळू शकेल.
सुरुवातीपासून हे प्रकरण सर्वच पातळीवर दडपण्याचा तसेच भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला. जनक्षोभ वाढला तेव्हा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची वरपांगी घोषणा आपण केली. त्या एसआयटीचे पुढे काय झाले? त्याचे प्रमुख कोण? सदस्य कोण? हे समजले नाही. त्यामुळे एसआयटीची घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे. आता असे समोर आले की, एसआयटी राहिली बाजूला, खंडणीरूपाने जमा केलेल्या या रकमेबाबत एक साधा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरण दडपण्यात आले. ही बाब लाजिरवाणी तसेच आपण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किती गंभीर आहात हे दर्शविणारी आहे. भ्रष्टाचाऱ्यांना अभय देण्याचाच हा प्रकार आहे.
आपल्या राज्यात हे असेच चालणार असेल तर, राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते बरखास्त करून मोकळे व्हा आणि भ्रष्ट अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना महाराष्ट्र भूषण तसेच त्यांचे पीए किशोर पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करा, असे मी आपणास सुचवीत आहे. Dhule extortion case
Investigate the Dhule extortion case in the right direction, otherwise there will inevitably be other explosions in this case, Sanjay Raut warns the Chief Minister in a letter
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी