Prithviraj Chavan : मतदारांच्या याद्यांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काँग्रेसची समिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Prithviraj Chavan विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या याद्यांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॉंग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती मतदार याद्यांशी संबंधित गैरप्रकार कसे रोखता येतील? याबाबत उपाय सुचवणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली.Prithviraj Chavan

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेससह विरोधी पक्षाने निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचे वारंवार आरोप केले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये घोळ होऊ नये यासाठी कॉंग्रेसने ही समिती नेमली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परिक्षित विरेंद्र जगताप हे सदस्य आहेत तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे समन्वयक म्हणून आपली भूमिका पार पाडतील.

“भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून गैरमार्गाने सत्ता मिळवली. यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी समिती उपाय शोधणार आहे. काँग्रेसने यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांमधील गैरप्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. पण, आयोगाने अद्याप समाधानकारक उत्तर दिलेले नाही. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी गैरमार्गाचा वापर करत आहे. मतदार याद्यांमध्ये मोठया प्रमाणात घोटाळे केले जात आहेत,” असे यावेळी कॉंग्रेसने म्हटले आहे. ही समिती या प्रकरणाचा अभ्यास करून आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहे.

कॉंग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडियावरून सविस्तर भाष्यही केले होते. पण, निवडणूक आयोगाकडून हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.

Congress committee to check alleged irregularities in voter lists

महत्वाच्या बातम्या