विशेष प्रतिनिधी
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी अतिवादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली. “गृहमंत्री अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवले पाहिजे,” असे वक्तव्य त्यांनी केले. Mahua Moitra
बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदा घुसखोरीबाबत बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली. “देशाच्या सीमांचे रक्षण करणारा कोणी नाही का? लाखो-कोटींनी घुसखोर भारतात येत आहेत. आपल्या माता-भगिनींवर डोळा ठेवत आहेत, आपली जमीन बळकावत आहेत… अशा वेळी सर्वात आधी अमित शाह यांचे डोके छाटून टेबलावर ठेवले पाहिजे,” असे महुआ मोईत्रा म्हणाल्या.
त्यांनी आरोप केला की गृहमंत्रालय आणि गृहमंत्री आपल्या सीमांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. “पंतप्रधान स्वतः सांगतात की परकिये येथे येत आहेत, आपल्या माता-भगिनींवर डोळा ठेवत आहेत. मग या अपयशाची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यावीच लागेल,” असे त्या म्हणाल्या.
यापूर्वीच केंद्र सरकारने रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी ‘ऑपरेशन पुशबॅक’ सुरू केले आहे. मात्र, महुआ मोईत्रा यांनी बीएसएफलाही लक्ष्य केले. “बीएसएफ इथे आहे. मग बीएसएफ काय करत आहे? आम्ही स्थानिक नागरिक मात्र त्यांच्यापासून घाबरून राहतो. प्रत्यक्षात आम्हाला घुसखोरी दिसतच नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
.यासंदर्भात बंगाल भाजपने म्हटले आहे की, “जेव्हा महुआ मोइत्रा गृहमंत्र्यांचे शीर कापण्यासंदर्भात भारष्य करतात, तेव्हा ते टीएमसीची हताशा आणि हिंसेची संस्कृती दर्शवते. ज्यामुळे बंगालची छबी खराब होत आहे आणि राज्याला मागे नेत आहे. ” पक्षाने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यात मोइत्रा पत्रकारांसोबत बोलताना दिसत आहेत.