मेलो तरी मुंबई सोडणार नाही, पोलिसांच्या नोटिशीनंतरही जरांगे उपोषणावर ठाम

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी मेलो तरी मुंबई सोडणार नाही, असे म्हणत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने जरांगे यांच्या उपोषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. जरांगेंच्या या उपोषणाचा आज मंगळवारी पाचवा दिवस आहे. एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाने जरांगेंच्या या उपोषणावर सरकारला तोडगा काढण्यास सांगितला आहे. मुंबई पोलिसांनी जरांगेंना आंदोलनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबतची नोटीस पाठवली आहे. आंदोलनाला अधिक तीव्र रूप येत असतानाच, मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला आंदोलकांना दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पोलिसांकडून त्यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे. यावर जरांगेंनी मराठे कुणाला घाबरत नाही, मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असे स्पष्ट केले आहे.



मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी 1 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशांचे आणि आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलकांनी आझाद मैदान रिकामे करावे, असेही या नोटिशीत म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यासह शहरभर विशेषतः दक्षिण मुंबईत भटकंती करणाऱ्या मराठा आंदोलकांना मुंबई ठप्प तसेच मुंबईकरांची गैरसोय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात सुनावले आहे. तसेच परवानगीशिवाय गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याचे देखील न्यायालयाने आदेश दिले आहेत. रस्ते, पदपाथ तसेच रेल्वे स्थानक मोकळे व स्वच्छ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Manoj Jarange insists on hunger strike even after police notice

महत्वाच्या बातम्या