ShahRukh Khan आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत बनू शकते’शूट इन इंडिया’, अभिनेता शाहरुख खानचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारतात खूप संधी आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत ‘शूट इन इंडिया’ बनू शकते, असे मत अभिनेता शाहरुख खान याने व्यक्त केले.
वेव्हज शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानिमित्त आयोजित ‘द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलर’ या सत्रात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

वेव्हज या शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अभिनेता शाहरुख खान यांनी चित्रपट उद्योगाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. या परिषदेमध्ये मनोरंजन उद्योगाला अधिक मजबूत करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. हे व्यासपीठ उद्योगासाठी किती समर्पक आहे आणि ते विविध आघाड्यांवर सरकारकडून अत्यंत आवश्यक समन्वय आणि पाठबळ उपलब्ध करून देईल, असा विश्वास शाहरुखने व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांशी विविध प्रकारचे करार भारताच्या मनोरंजन उद्योगाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात यावर त्यांनी भर दिला. चित्रपट उद्योगातील त्यांच्या प्रवासावर आणि स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण केले यावर बोलताना शाहरुख खान यांनी ‘आउटसाइडर-इनसाइडर’ टॅग्जबद्दल आपले विचार मांडले. तरुणांनी इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच चित्रपट उद्योगाकडे पाहावे. इथेही कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही असे त्यांनी सांगितले.

द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमा अधिक परवडणारा बनावा. या शहरांमध्ये एकल पडदा असलेल्या चित्रपटगृहांमध्‍ये सिनेमा पाहण्‍याचा अनुभव निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, ज्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

अभिनेत्री दीपिका पदुकोण वेव्हजचे महत्त्व मांडताना म्हणाली, माध्‍यम आणि मनोरंजन उद्योगातील विविध माध्यमांना एकत्र आणण्याची ही अचूक वेळ आहे. या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आतापर्यंत माहितीचे आदान- प्रदान किंवा सहकार्य मर्यादित स्वरूपात केले जात होते, पण वेव्हजचे स्वरूप व्यापक आहे आणि त्यात चित्रपट, ओटीटी, ॲनिमेशन, कृत्रिम प्रज्ञा आणि इतर भासमान तंत्रज्ञाने एकत्र आणण्याची क्षमता आहे.

समाज माध्‍यमे आणि प्रतिमा व्यवस्थापनाच्या आजच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या बदलत्या परिमाणांबद्दल बोलताना, खान यांनी नवीन कलाकारांना केवळ त्यांच्या विशिष्‍ट प्रतिमा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील कौशल्यांकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्यातील अद्वितीय गूण आणि क्षमतांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे दीपिका पदुकोण यांनी पुढे नमूद केले.

आपल्या समारोपाच्या भाषणात, चित्रपट निर्माते करण जोहर यांनी भारताला ‘सॉफ्ट पॉवर’ असे संबोधित केले. आपला देश येत्या काळात ‘वेव्हज’सह उत्तुंग झेप घेण्यास सर्व सामर्थ्‍यानिशी सज्ज आहे असे जोहर यांनी अभिमानाने सांगितले.

India can become ‘Shoot in India’ for international filmmakers, believes actor ShahRukh Khan

महत्वाच्या बातम्या