Kashmir : दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत सज्ज! ७ मे रोजी मॉक ड्रिलद्वारे सज्जता तपासली जाणार, नागरिकांना प्रशिक्षण देण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी घडवून आणलेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जो निर्धार केला आहे, तो आता कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने निर्णायक पावले उचलली असून, ७ मे रोजी संपूर्ण देशभरात युद्धजन्य सज्जतेची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.

या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन्स, नागरिकांचे प्रशिक्षण, स्थलांतर योजना, ब्लॅकआउट उपाय, तसेच महत्त्वाच्या प्रकल्पांचे कॅमोफ्लाजिंग याचा समावेश असणार आहे. ही तयारी म्हणजे केवळ एक औपचारिकता नसून, भारताचा पाकिस्तानला दिलेला संदेश आहे.



२६ निष्पाप नागरिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, म्हणूनच भारत सरकारने पाकिस्तानविरोधात सिंधू जलकरार निलंबित करणे, अटारी सीमेवरील वाहतूक बंद करणे, पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करणे आणि पाकिस्तानसाठी भारतीय आकाशमार्ग बंद करणे अशा कठोर उपाययोजना तातडीने लागू केल्या आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानकडूनही व्यापार थांबवण्याचा निर्णय आणि शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे सीमांवर तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारत आज न फक्त सज्ज आहे, तर उत्तर द्यायला पूर्ण सक्षम आहे, हे दाखविण्यासाठी मॉक ड्रिल महत्वाचे ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला दिलेले “पूर्ण स्वातंत्र्य” दिले आहे. हा केवळ एक आदेश नाही, तर शत्रूला दिलेला इशारा आहे. आता प्रत्येक भारतीय सज्ज आहे याचे दर्शन घडणार आहे.

India ready to give a befitting reply to terrorism mockdrill in kashmir

महत्वाच्या बातम्या