तमिळ बोलता येत नाही म्हणून मराठी माणसावर तामिळनाडूमध्ये हल्ला

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी महाराष्ट्रात मराठी आले नाही तरी चालेल असे वक्तव्य केले होते. मात्र केवळ पर्यटनासाठी तामिळनाडूत गेलेल्या एका मराठी माणसाला तमिळ येत नसल्याने मारहाणीचा सामना करावा लागला.

तामिळनाडूमधील थेनी जिल्ह्यात एका बसमध्ये पुण्याच्या भूषण मुंडलिक (३४) यांच्यावर केवळ तामिळ भाषा न येण्याच्या कारणावरून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी व्यक्तीने त्यांना तामिळ येते का असे विचारले आणि नकारात्मक उत्तर मिळताच अचानक हल्ला केला.

मुंडलिक २६ फेब्रुवारी रोजी कोयंबतूर येथील ईशा योग केंद्रात महाशिवरात्री कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी तामिळनाडू आणि केरळ मध्ये पर्यटनासाठी फिरायचे ठरवले. ५ मार्च रोजी ते केरळच्या मुन्‍नारहून तामिळनाडूच्या थेनीकडे जाणाऱ्या बसमध्ये होते. त्यांचे पुढील गंतव्य रामेश्वरम होते.

मुंडलिक म्हणाले, मी बसमध्ये खिडकीजवळ बसलो होतो आणि निसर्गरम्य घाटातून जात असताना बाहेर पाहत होतो,” त्याच दरम्यान त्यांच्या शेजारी एक व्यक्ती येऊन बसली आणि इंग्रजीत तुटक शब्दांत त्यांना तामिळ येते का, असे विचारले. मुंडलिक यांनी आपण महाराष्ट्राचे असल्याचे सांगून तामिळ येत नसल्याचे स्पष्ट केले.त्या व्यक्तीने काही क्षण शांत राहिल्यावर अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता माझ्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारला,” असे मुंडलिक म्हणाले. या हल्ल्यात त्यांचा चष्मा तुटला आणि त्यांना डोळ्याजवळ व नाकावर गंभीर दुखापत झाली.

रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांनी हातानेच तो रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचा चेहरा अत्यंत आक्रमक दिसत होता, त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो, असेही त्यांनी सांगितले. मुंडलिक यांनी असा दावाही केला की बसमधील आणखी एका तामिळ व्यक्तीने त्यांच्या गळ्यात ठेवलेल्या रुमालावरून त्यांची थट्टा केली.

थेनी येथे पोहोचताच स्थानिक पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे नाक दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे निदान केले आणि डोळ्यावर उपचार केले.

Marathi man attacked in Tamil Nadu for not being able to speak Tamil

महत्वाच्या बातम्या