Karachi stock market : भारताच्या कठोर निर्णयांचा परिणाम! पहलगाम हल्ल्यानंतर कराची शेअर बाजारात २% घसरण, गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता

विशेष प्रतिनिधी

कराची / नवी दिल्ली : Karachi stock market  जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात उचललेल्या कठोर पावलांचा आर्थिक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. पाकिस्तानच्या कराची शेअर बाजारात (KSE-100) आज २% पेक्षा अधिक घसरण नोंदवण्यात आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.Karachi stock market

२२ एप्रिल रोजी झालेल्या पाहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक भूमिका घेत पाकिस्तानविरोधातील अनेक धोरणात्मक निर्णय जाहीर केले. यामध्ये अटारी लँड पोर्ट बंद करणे, सिंधू जल करार तात्पुरता स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा रद्द करणे आणि विद्यमान व्हिसा २७ एप्रिलपासून अमान्य करणे, अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.

या निर्णयांमुळे भारत-पाकिस्तान व्यापारसंबंधांवर थेट परिणाम झाला असून, त्याचा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. कराची शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक KSE-100 आज सकाळीच्या सत्रात १२०० पेक्षा अधिक अंकांनी घसरला. विशेषतः बँकिंग, ऊर्जा आणि आयात-निर्यात क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदली गेली.

पाकिस्तानमधील अर्थतज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. इस्लामाबादमधील एका विश्लेषकाने सांगितले की, “भारताशी व्यापारिक संबंध बिघडल्यास परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास अधिकच डळमळीत होईल. याचे दुष्परिणाम दीर्घकालीन असू शकतात.”

दरम्यान, भारतात मात्र शेअर बाजार स्थिर आहे आणि बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टीने सौम्य वाढ दर्शवली आहे. काही विश्लेषकांनी याचे श्रेय भारत सरकारच्या निर्णायक भूमिकेला दिले आहे.

पाहलगाम हल्ल्याचे पडसाद केवळ सुरक्षा आणि राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारातही उमटत असून, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर याचा दबाव वाढण्याची चिन्हं आहेत.

Result of India’s tough decisions! Karachi stock market falls 2% after Pahalgam attack, investors are unsettled

महत्वाच्या बातम्या