Asaduddin Owaisi : देशावर हल्ला झालाय ,राजकारण बाजूला ठेवून एकत्र उभं राहिलं पाहिजे, असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Asaduddin Owaisi वक्फ कायद्यावर आमचा विरोध सुरू राहील, तो आमचा देशांतर्गत मुद्दा आहे. पण जेव्हा देशावर हल्ला होतो, तेव्हा राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन एआयएमआयएमचे ( AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.Asaduddin Owaisi

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेला विरोधकांकडून पाठिंबा मिळत आहे. एआयएमआयएमचे ( AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ठाम भूमिका घेत पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.

एका मुलाखतीत बोलताना ओवैसी म्हणाले, “पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला हल्ला पूर्णपणे पाकिस्तान पुरस्कृत होता. अशा घटनांनंतर कोणताही देश शांत बसणार नाही. हे दहशतवादी भारतात घुसून काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष्य करत होते. जे मुस्लिम नव्हते, जे ‘कलमा’ म्हणू शकले नाहीत, त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांच्या डोळ्यांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. ही मानवतेविरोधातील अमानुष क्रूर घटना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार (अनुच्छेद 51) आत्मसंरक्षणाचा हक्क आहे. भारताच्या संविधानातही (अनुच्छेद 355) केंद्र सरकारचं कर्तव्य आहे की बाह्य आक्रमण झाल्यास जनतेचे संरक्षण करावं. आज भारताने जो पवित्रा घेतला आहे, त्याला मी पाठिंबा देतो.

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या टीआरएफ यांना अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित करायला लावायला हवे. ब्रिटन, आणि अमेरिका यांनी पाकिस्तानवर निर्बंध घालावेत यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत. चिनाब आणि झेलम नदीवर धरणे उभारून दीर्घकालीन रणनीती आखावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ओवैसी म्हणाले, “देशभरात ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा उत्साह आहे. सरकारने याचा उपयोग देशाला एकत्र आणण्यासाठी करायला हवा. काही जण देशात धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करू पाहतात, अशांना रोखलं पाहिजे. त्यांनी एक उदाहरण देताना सांगितले की, “हिमांशी नरवाल हिच्या पतीचा मृत्यू लग्नाच्या सातव्या दिवशी पहलगाम हल्ल्यात झाला. पण तिने म्हटलं होतं, ‘काश्मिरी आणि मुस्लिमांविषयी द्वेष ठेवू नका.’ यानंतर तिला लक्ष्य केलं गेलं. ही खूप दु:खद बाब आहे.”

मी जो काही बोलतोय, तो माझा कायमस्वरूपी विचार आहे. देशावर दहशतवादी हल्ला झाल्यास मी बोलणारच. मला कोणाकडून मान्यता हवी नाही. माझ्या देशासाठी मी मनापासून बोलतो आणि काम करतो,” असंही ओवैसी यांनी ठामपणे सांगितलं.

The country has been attacked, we should put politics aside and stand together, Asaduddin Owaisi hits out at Pakistan

महत्वाच्या बातम्या