विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील चर्चेत असलेल्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. “ना हनी आहे, ना ट्रॅप आहे. पण विरोधक जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत आहेत. आजी-माजी मंत्री एकमेकांकडे संशयाने बघत आहेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांना सुनावले. Nana Patole
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील हनीट्रॅप प्रकरण चर्चेत होते. नाना पटोले यांनी विधानसभेत दावा केला की, मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले असून, राज्यातील मंत्री या गंभीर विषयावर न प्रतिक्रिया देत आहेत, ना विधानसभेत उत्तर देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर नाशिकमधील एका विशिष्ट हॉटेलचा उल्लेख केला होता.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
या आरोपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “नानाभाऊ म्हणतात त्यांनी बॉम्ब आणला आहे. पण तो बॉम्ब आम्हाला कुठेच सापडला नाही. जर तुमच्याकडे खरोखर काही पुरावे असतील, तर ते सादर करा. आतापर्यंत केवळ नाशिकमधील एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भातील एकच तक्रार होती आणि ती देखील नंतर मागे घेतली गेली आहे.”
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा संदर्भ घेताना फडणवीस म्हणाले, “ज्याचा सातत्याने उल्लेख होत आहे त्या हॉटेलच्या मालकाने काँग्रेसकडून निवडणूक लढवली आहे, आणि तो काँग्रेस पक्षाचा माजी अध्यक्ष आहे. मग आता काँग्रेसच काय म्हणणे आहे?
नाना पटोले यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, “अशा गंभीर विषयांवर जर खरेच काही मांडायचे असेल, तर पुरावे घेऊन या आणि मांडणी करा. सत्ताधाऱ्यांची बोलती बंद करायची असेल, तर अशा गोंधळामुळे नाही, तर ठोस मुद्द्यांमुळे करावी लागते. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे, आणि आजही आहे. पण ज्या लोकांकडून सतत विष पेरले जात आहे, त्यांना वेळीच रोखणं गरजेचं आहे.”