Sadabhau Khot : कर्जमाफीवर विरोधकांचे बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू, सदाभाऊ खोत यांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी

नाशिक : विरोधकांचे कर्जमाफीवर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू आहेत,” अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना केली आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना खोत म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नक्कीच आहे. पण केवळ कर्जमाफी करून उपयोग नाही. शेतकऱ्यांवर असलेली बंधने तशीच राहिल्यास त्यांच्या अडचणी कायम राहतील. त्यामुळे दीर्घकालीन आयात-निर्यात धोरण किमान पाच वर्षांसाठी असणे गरजेचे आहे. सरकारने असे धोरणात्मक कायदे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरोधक आडवे आले. आज मात्र तेच गळा काढत आहेत. हे प्रकार म्हणजे निव्वळ ढोंग आहे.”

2020 मधील कांदा आंदोलनाचा उल्लेख करत महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना खोत म्हणाले, “त्या वेळी आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडले होते. कोणतेही आर्थिक नुकसान झाले नव्हते. पण सरकारने आंदोलन चिरडण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळीचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी किरकोळ कलमे लावल्याबद्दल कर्मचाऱ्यांना झापले होते. शेतकरी पोर अधिकारी झाल्यावर कसे मस्तवाल होतात याचे हे उदाहरण आहे. माझ्यावर 263 गुन्हे दाखल करण्यात आले. प्रत्येक आंदोलनस्थळी मी होतो, असे गृहित धरून गुन्हे लावण्यात आले. विस्थापितांच्या प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो, म्हणून गुन्हे लावले गेले. हे लोक नेते नव्हते, तर शेतकऱ्यांचे खळं लुटणारे होते.

खोत म्हणाले, “आज मातीपेक्षा जातीला महत्त्व दिलं जातंय. ज्याची जात श्रेष्ठ तोच वजनदार, अशी एक नवी वाट सुरू आहे. जातीनुसार मतांचं राजकारण केलं जातंय. मातीतल्या खऱ्या शेतकऱ्याला मतदानाच्या राजकारणात स्थान मिळेपर्यंत त्याच्या अडचणी सुटणार नाहीत.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक करत खोत म्हणाले, “राज्याला कणखर महसूल मंत्री मिळाले आहेत. आतापर्यंत अनेक महसूल मंत्री पाहिले, पण सध्याच्या मंत्रिमंडळात बावनकुळे सर्वांत कार्यक्षम मंत्री आहेत.”

लाडकी बहीण योजनेसाठी समाजकल्याण विभागाचा निधी वळविल्याच्या वादावर बोलताना खोत म्हणाले, “ राज्याचे मुख्यमंत्रिपद अभ्यासू नेत्याकडे आहे. निधी थांबवला, असे म्हणण्यात अर्थ नाही. सर्वांनाच निधी दिला जातो आणि राहिलेला निधी नियोजनानुसार वर्ग केला जातो. बजेट सादर करणे म्हणजे तितका पैसा हातात असतो असे नव्हे. ती एक नियोजन प्रक्रिया असते.

जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दर्जावरही खोत यांनी नाराजी व्यक्त केली. “कामांचा दर्जा घसरला आहे. अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट टोळी सक्रिय आहे. पाणी देण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट आहे की फक्त घसा कोरडा ठेवण्यासाठी, हेच कळेनासं झालं आहे.

Opposition’s talk on loan waiver is like crocodile tears, Sadabhau Khot slams

महत्वाच्या बातम्या