Sanjay Rathod संजय राठोडांचे खळबळजनक विधान,उद्धव ठाकरे यांच्याशी आजही माझे चांगले संबंध, थेट एकनाथ शिंदेंना दिले आव्हान

विशेष प्रतिनिधी

नांदेड : महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी थेट शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. “मी कधी नापास होऊ शकत नाही, उलट तुम्हालाच नापास करीन,” असा थेट इशारा त्यांनी दिला. Sanjay Rathod

नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या संवाद मेळाव्यात बोलताना राठोड यांनी हे विधान केले. फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या कामगिरीचं प्रगती पुस्तक जाहीर केलं असून त्यामध्ये राठोड यांना ‘नापास’ ठरवण्यात आलं आहे. या संदर्भात त्यांनी सरकारवर आणि विशेषतः शिंदे गटावर टीका करत म्हटलं, “मी कधी परीक्षा दिली नाही, मग कुणी पेपर तपासले? आणि मी नापास कसा ठरलो?”

सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंशी माझे आजही चांगले संबंध आहेत. त्यांचे मला आजही फोन येतात.” हे विधान करताना त्यांनी सूचकपणे एकनाथ शिंदेंना थेट संदेश दिला की ते अजूनही ठाकरे गटाशी संवाद ठेवून आहेत.



त्यानंतर माध्यमांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारताच राठोड मात्र माघारी फिरताना दिसले. “मी असं काही बोललोच नाही,” असा खुलासा त्यांनी दिला.

संजय राठोड हे पूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते. परंतु पूजा चव्हाण प्रकरणानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीत त्यांनी सहभाग घेतला आणि महायुती सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळवलं.

मात्र आता राठोड यांनी उद्धव ठाकरेंशी अजूनही संपर्क असल्याचा दावा करून एक प्रकारे शिंदे गटात असले तरी त्यांची निष्ठा अजून पूर्णपणे बदललेली नाही, असे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

Sanjay Rathod sensational statement, I still have good relations with Uddhav Thackeray, directly challenged Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या