Varsha Gaikwad : काँग्रेसमध्ये घमासान वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी; भाई जगतापांना कारणे दाखवा नोटीस

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Varsha Gaikwad मुंबई महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला असून, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यावरून भाई जगताप यांना बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस यामुळे पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.Varsha Gaikwad

महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवत काँग्रेसला केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपप्रणीत महायुती आणि ठाकरे बंधूंच्या युतीसमोर काँग्रेस पूर्णपणे पिछाडीवर पडली. या अपयशाची जबाबदारी स्वीकारत वर्षा गायकवाड यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी केली होती.Varsha Gaikwad



निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच जाहीरपणे राजीनाम्याची मागणी केल्याने पक्षाने कडक भूमिका घेतली. काँग्रेसचे सचिव आणि मुंबई प्रभारी यू. व्ही. व्यंकटेश यांनी भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास पुढील कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर आरोप सुरूच आहेत. प्रभाग रचना, मतदान यंत्रणा, शाईचा वापर आणि कथित फिक्सिंगमुळे भाजपला फायदा झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे आणि निष्पक्ष भूमिका घ्यावी, अशी मागणीही पक्षाकडून होत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (सपकाळ) यांनीही भाजपवर हल्लाबोल करत हुकूमशाही प्रवृत्तींचा शेवट अटळ असल्याचा इशारा दिला आहे.

एकीकडे निवडणुकीतील पराभव, तर दुसरीकडे नेतृत्वावरून सुरू असलेले अंतर्गत संघर्ष, यामुळे मुंबई काँग्रेससमोरील संकट अधिकच गडद झाले असून, पक्षासाठी पुढील काळ मोठी कसोटी ठरणार आहे.

Congress in Turmoil: Resignation Call for Varsha Gaikwad, Show-Cause Notice Issued to Bhai Jagtap

महत्वाच्या बातम्या