विशेष प्रतिनिधी
मुंबई : दादरमधील कबुतरखाना प्रकरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी कबुतरखाना बंद करून त्यावर ताडपत्री टाकत सील केले होते. मात्र, त्यानंतर जैन धर्मियांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत जबरदस्तीने ताडपत्री काढून कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. Dadar Pigeon
यावरून मराठी एकीकरण समितीने कबुतरखान्याला विरोध करत आंदोलन केले, आणि त्यावेळी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी “गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ” असे वादग्रस्त विधान केल्याने वाद वाढला होता. तथापि, आता त्यांनी संघर्षाऐवजी शांततामय मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
महावीर मिशन ट्रस्टने आधीच इशारा दिला होता की, राज्य सरकारने कबुतरखाना प्रकरणात तोडगा काढला नाही तर दिवाळीनंतर उपोषण केले जाईल. त्यानुसार, जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.
११ ऑक्टोबर रोजी दादरमधील योगी सभागृहात महावीर मिशनच्या वतीने “मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी” या उद्देशाने धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत निलेशचंद्र विजय यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत शांतीदूत जनकल्याण पार्टीकडून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती.
त्यांनी म्हटले होते की, “ही फक्त जैन लोकांची पार्टी नसेल, तर राजस्थानातील ३६ समाज, तसेच मारवाडी आणि गुजराती समाजातील प्रतिनिधींना आम्ही एकत्र आणणार आहोत.”
जैन समाजाचे म्हणणे आहे की, कबुतरखाने हे त्यांच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत, आणि त्यांना बंद करणे म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आहे.
त्यामुळेच दिवाळीनंतर म्हणजे १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात शांततामय उपोषण करून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सामान्य मुंबईकरांचा कबुतरखान्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषण आणि आरोग्य धोक्यांमुळे तीव्र विरोध कायम असून, एका बाजूला नागरिकांचा विरोध आणि दुसऱ्या बाजूला जैन समाजाचा आग्रह असे चित्र सध्या दादर परिसरात दिसत आहे.
Dadar Pigeon controversy flares up again; Jain sage Nileshchandra Vijay to sit on hunger strike from November 1
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..