रुपाली चाकणकरांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा!;भोंदूबाबा खरात प्रकरणाचा पहिला मोठा बळी!

विशेष प्रतिनिधी

पुणे: गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे. शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले अघोरी विद्येचे आरोप आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केलेले आर्थिक व्यवहारांचे प्रश्न, या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे.

मुख्यमंत्र्यांचा ‘फॅक्ट चेक’ आणि राजीनाम्याचे आदेश!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात समोर आलेले फोटो, व्हिडिओ आणि पीडितेने केलेले गंभीर दावे पाहता, सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले. ‘महिला आयोगा’सारख्या घटनात्मक संस्थेची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तातडीने राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर काही तासांतच चाकणकर यांनी आपले राजीनामा पत्र सादर केले.

राजीनामा पत्रात काय म्हटले आहे?

रुपाली चाकणकर यांनी आपल्या पत्रात राजकीय किंवा आरोपांचा कोणताही उल्लेख टाळून ‘वैयक्तिक कारणास्तव’ राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पत्रातील मुख्य अंश खालीलप्रमाणे:

“मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर… माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे.”

विरोधी पक्षाचा आक्रमक पवित्रा ठरला निर्णायक!

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेले ते ‘रक्ताळलेले बोट’ आणि अघोरी पूजेचे दावे यांमुळे चाकणकर पूर्णपणे बॅकफूटवर गेल्या होत्या. “ज्या खुर्चीवर बसून महिलांना न्याय द्यायचा, त्याच खुर्चीचा वापर गुन्हेगारांना वाचवण्यासाठी झाला,” असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला होता. या राजकीय दबावामुळे सरकारला अखेर हा कठोर निर्णय घ्यावा लागला.

पुढील दिशा काय?

राजीनामा दिला असला तरी चाकणकर यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. सुषमा अंधारे यांनी मागणी केल्याप्रमाणे:

* चाकणकर यांची आता नार्को टेस्ट होणार का?
* अशोक खरात आणि त्यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी एसीबी (ACB) करणार का?
* पोलीस त्यांना या गुन्ह्यात ‘सह-आरोपी’ म्हणून ताब्यात घेणार का?

या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतील. मात्र, चाकणकर यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Rupali Chakankar Resigns as Chairperson of the State Women’s Commission

महत्वाच्या बातम्या