Social Media Users and Influencers : देशविरोधी सोशल मीडिया युजर्स व इन्फ्लुएन्सर्सवर कारवाईसाठी सरकारचे पाऊल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या देशविरोधी व विघातक सामग्रीबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीने “अतिशय तातडीचे” असे नमूद केलेले कार्यालयीन स्मरणपत्र जारी केले आहे. देशविरोधी कार्यात गुंतलेल्या सोशल मीडिया युजर्स व इन्फ्लुएन्सर्सवर कारवाईसाठी सूचना दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाला सूचना देण्यात आल्या आहेत की, आयटी कायदा २००० आणि आयटी नियम, २०२१ अंतर्गत कोणती कारवाई प्रस्तावित आहे, याचा तपशील ८ मे २०२५ पर्यंत सादर करावा.

पहलगाम हल्ल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी हिंसा भडकावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी व राष्ट्रीय एकतेला बाधा आणणाऱ्या पोस्ट केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता डिजिटल माध्यमांवर नियंत्रण आणण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. या कारवाईचा मुख्य उद्देश फक्त युजर्सवरच नव्हे, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही लक्ष ठेवणे आहे.

समितीने दोन्ही मंत्रालयांनी स्मरणपत्राचा स्वीकार करावा व सर्व आवश्यक माहिती समितीच्या अधिकृत ईमेल पत्त्यावरही पाठवावी, अशा सूचना दिल्या आहेत. या घडामोडीमुळे “राष्ट्रीय सुरक्षेच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किती मर्यादा हव्यात?” अशी चर्चा सुरू झाली आहे.

Government steps to take action against anti-national social media users and influencers

महत्वाच्या बातम्या