Ajit Pawar अजित पवार म्हणाले सगळी सोंगे आणता येतात पण…

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी गुरुवारी विधानसभेत केले.

ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण 9 हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. मात्र निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे दीड हजारावरून 2100 रुपये होण्यासाठी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मदतीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विधानसभेत 2025-26 च्या अर्थसंकल्पातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ, असे त्यांनी सांगितले.

लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्यात आम्ही नाही म्हटलेले नाही. आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, सर्व सोंगं करता येतात, मात्र पैशांचे सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्ज माफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेत भाग घेताना राज्य सरकारने लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवावे, अशी सूचना केली होती. त्यासाठी त्यांनी केरळसह अन्य राज्यांना लॉटरीपासून मिळणाऱ्या महसुलाची माहिती दिली. या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी आपल्या उत्तरात सर्व प्रकारच्या लॉटरीच्या माध्यमातून राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची समिती नेमण्याची घोषणा केली. या समितीने अभ्यास करून महिनाभरात अहवाल द्यावा, असे पवार म्हणाले.

सध्या राज्याचे स्थूल उत्पन्न 49 लाख 39 हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे सरकारची महसुली तूट ही 1 टक्क्यांच्या आत आहे. 2015 मध्ये राज्याचे स्थूल उत्पन्न 12 लाख 80 हजार कोटी रुपये असतानाही महसुली तूट 1 टक्क्यांच्या आत होती. तथापि 2025-26 या आर्थिक वर्षात 100 टक्के महसूल जमा करून राज्याला आर्थिक शिस्त लावायची असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, 2024-25 या चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 77.26 टक्के खर्च झाल्याचे सांगत पवार यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांचा 40 टक्के खर्च झाल्याचा दावा खोडून काढला.

Ajit Pawar said that all the tricks can be brought but

महत्वाच्या बातम्या