विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात कळत नकळत मांसाहार विरुद्ध शाकाहार असे युद्ध सुरू झाले आहे. २४ लाख विद्यार्थ्याचा पौष्टिक आहार अचानक बंद करण्यात आला आहे. पुरोगामी महाराष्ट्राने अंडी बंद करावी हे दुर्दैव आहे, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
शालेय पोषण आहारावर आव्हाड म्हणाले, एकीकडे करोडो करार बाहेर देशात करून आले पण आपल्याकडे अंडी बंद केले . आता महाराष्ट्रात फक्त बोर्नव्हिटा खाणाऱ्या पोरांनीच जगायचं का? हा महाराष्ट्र गरिबांचा नाही का? मुलांच्या आरोग्यावर परिणाम होईल अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे का? आमच्या मनात दाट शंका आहे बीजेपीशासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आहेत. त्याचबरोबर दक्षिणेतली जे राज्य आहेत कर्नाटका आंध्र प्रदेश तमिळनाडू केरला यांनी अंड्यांचं प्रमाण वाढवलं आहे.
मनुवादाचा छुपा अजेंडा तरी राबवत नाहीत ना अशी शंका आहे. महाराष्ट्रात कळत नकळत मांसाहार विरुद्ध शाकाहार असे एक युद्ध सुरू आहे. शाकाहारांपेक्षा 90% लोक परंपरेने मांसाहारी आहेत. शाकाहारी माणसांचं राजकीय, शासकीय वजन जास्त असल्यामुळे अंड्यांवरती बंदी आली आहे. ज्याला जे आवडतं ते खाऊ द्या ना. शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का? असा सवाल करत आव्हाड म्हणाले, द्या आमच्या मुलांना गरम दुधातून बॉर्नविटा, हॉर्लिक्स द्या. आमची पोरं प्यायला तयार आहेत. क्या गरीबो की जान जान नही होती शेठ, असा सवालही त्यांनी केला.
संतोष देशमुख खून प्रकरणावर आव्हाड म्हणाले, मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडे यांनी केलेला नाही. पण ते निर्दोष नाहीत. या गॅंगला पोसण्याचं,राजकीय राजश्रय देण्याचं काम त्यांनी कळत न कळत केलं आहे. संतोष देशमुख यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे
दहावी बारावी परीक्षा केंद्रावर बुरखा बंदी घाला या मंत्री नितेश राणे यांच्या मागणीवर तुम्हाला कसंही करून धार्मिक तेढ वाढवायची आहे असा आरोप करत आव्हाड म्हणाले, कॉपी ही बुरख्यातच होते जीन्समध्ये होत नाही असं त्यांना म्हणायचं आहे का? कॉपी करण्याचे अनेक मार्ग आहेत. पण त्याच्यासाठी शाळेत जावं लागतं परीक्षा द्यावी लागते. मी करत नव्हतो पण मला माहिती आहे कसं कॉप्या करतात. अर्थव्यवस्थेचे बारा वाजलेत. व्यवस्थेचे बारा वाजलेत. एका योजनेसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना बंद पाडल्या आहेत. मग याच्यावर एकच उपाय. हिंदू मुसलमान.असा आरोप त्यांनी केला.
Jitendra Awhad angry at eggs banned, said meat vs vegetarian war in Maharashtra
महत्वाच्या बातम्या