विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात मान्सूनचे अधिकृत आगमन झाले तळ कोकणातून मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून हवामान विभागाने राज्यातील २५ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Yellow Alert
पुढील चार ते पाच दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अकोल्यासह विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, तसेच या दरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनला आणखी काही वेळ लागणार आहे. येत्या १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने अधिकृत ट्विट करून देण्यात आली आहे.