लाल्या म्हणू नका, आरक्षणाच्या प्रश्नावर राहुल गांधींनीच काढलाय रामबाण उपाय, हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लाल्या वगैरे म्हणू नका. आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उपाय जो आहे तो केवळ आणि केवळ राहुल गांधी यांनी काढलेला आहे. मराठा समाजासोबत इतर समाजांना आरक्षण देण्याच्या अनुषंगाने जो फॉर्म्युला काढला आहे तो राहुल गांधी यांनी काढलेला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संकेत, राजकीय संकेत, सभ्यतेचे संकेत, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि सभ्यता या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाने गुंडाळून ठेवलेल्या आहेत. आम्ही देशाचे मालक आहोत आणि ‘हम करे सो कायदा’ असे भाजप वागत आहेत आणि आजच्या कार्यक्रमातही त्याचे दर्पण पाहायला मिळाले असल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत आघाडी न करण्याचे म्हटले होते. यावर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, इंडिया आघाडीचे गठन हे राष्ट्रीय स्तरावर झालेले आहे. त्यामुळे या संदर्भात राष्ट्रीय पातळीवरून प्रतिक्रिया येईल. मात्र, यातला मुळ मुद्दा जो आहे की, इंडिया आघाडी का गठित झाले? तर भाजपची जी दंडेलशाही आहे आणि हुकूमशाही आहे ती विसर्जित करून लोकशाही आणण्यासाठी इंडिया आघाडी ही संविधानाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी बनलेली आहे. या मूल्यांच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी जर कोणाशी संपर्क साधला असेल तर तिथूनच यावर योग्य वेळी योग्य निर्णय दिला जाईल.

मनोज जरांगे यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी वापरलेल्या भाषेवर प्रश्न विचारला असता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अनावश्यक वक्तव्य होते आणि अशा वक्तव्यांचा सातत्याने उच्चार करून आणि गरज नसलेल्या माणसाचा उद्धार करून जातीय तेढ आणि एकंदरीत महाराष्ट्रातले जी सद्भावना आहे ती लयास नेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे काही शेलक्या भाषेत बोलले जाते त्याचा आम्ही निषेधच केलेला आहे. त्यांनी ‘लाल्या’ वगैरे असे शब्द वापरू नयेत आणि आम्ही त्याचा निषेधच करतो. वास्तविक पाहता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे आणि ते मिळण्यासाठी विधानसभेने विधानपरिषदेने आढावा घेतला आहे. तसेच हा मुद्दा भाषणबाजी करून सुटणार नाही.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, देशभरातील आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उपाय जो आहे तो केवळ आणि केवळ राहुल गांधी यांनी काढलेला आहे. मराठा समाजासोबत इतर समाजांना आरक्षण देण्याच्या अनुषंगाने जो फॉर्म्युला काढला आहे तो राहुल गांधी यांनी काढलेला आहे. राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना करून समाजाचे सीटी स्कॅन काढत असताना जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानेच सर्वांना आरक्षण द्यावे ही स्वागतार्ह भूमिका राहुल गांधी घेतात आणि तरी देखील त्यांच्या विषयी असे शब्द वापरले जात असतील तर हे अतिशय दुःखद आहे.

ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष करायचे कारण नाही. ओबीसींचा टक्का वाढला पाहिजे आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. जाती-धर्म किंवा माणसामाणसांत समाज विभक्त करणे चुकीचे आहे. “कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा?” असा प्रश्न आहे. सत्ताधारी निवडणुका जवळ आल्यावर जातीवाद का वाढवतात? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्यावर जातीवाद कसा निर्माण होतो? सत्ताधाऱ्यांनी कोणताही राजकीय डाव न करता ताबडतोब जातीनिहाय जनगणना करावी आणि त्यानुसार आरक्षण द्यावे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला केले आहे.

Rahul Gandhi has come up with a panacea for the reservation issue, appeals Harshvardhan Sapkal

महत्वाच्या बातम्या