दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी असूनही जाणूनबुजून मराठा बांधवांना प्रमाणपत्र नाही, मनोज जरांगे यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

विशेष प्रतिनिधी

पनवेल : दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी असूनही अधिकारी जाणूनबुजून मराठा बांधवांना प्रमाणपत्र देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे आम्ही शांत आहोत, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी एकही प्रमाणपत्र थांबणार नाही आणि शिंदे समिती सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची आम्ही वाट पाहत आहोत, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. Manoj Jarange

सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांना मातृशोक झाल्याने, त्यांचे सांत्वन करण्यासाठी जरांगे पाटील पुण्याच्या चाकणमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, मी चांगले काम करत असल्याने माझ्यावर जळणारे लोक माझा घातपात करण्याच्या तयारीत आहेत. माझ्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पकडलेल्या तीन आरोपींनी जबाबात धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. असे असतानाही जालन्याच्या पोलिस अधीक्षकांनी धनंजय मुंडे यांना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे परवानगी का मागितली नाही?



आपल्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, मी सरकारचे पोलिस संरक्षण नाकारले आहे. माझ्यासोबत दिसणाऱ्या पोलिसाला चालताना धाप लागते. मात्र, मला संपवण्याचा कट रचला जात आहे. पकडलेल्या आरोपींनी कबुली दिली नसती, तर गोष्ट वेगळी होती. पण त्यांनी नाव घेतले आहे. नार्को टेस्टची मागणी करणारे आता कुठे गेले? त्यांनी पुढे येऊन आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करावी. या प्रकरणाचे पुढच्या काळात वाईट पडसाद उमटतील, असा इशाराही त्यांनी दिला.

सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावरही जरांगे यांनी सडकून टीका केली. अधिवेशनात दोन दिवस त्यांच्यातील लफडे आणि गोंधळातच जातील. हे सगळे मिळून शेतकऱ्यांचे वाटोळे करणार आहेत. कर्जमाफी करायची असेल तर नुसत्या गप्पा नकोत, थेट आदेश द्या. हे सत्ताधारी आणि विरोधक सगळेच ‘चाभरे’ आहेत, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. हैदराबाद गॅझेट मिळून तीन महिने झाले तरी समिती स्थापन झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली, मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शब्दावर अजूनही विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

warns Manoj Jarange as he signals fresh agitation

महत्वाच्या बातम्या