विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करत तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असून, “शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सहलींसाठी एसटीशिवाय पर्याय नाही,” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘शालेय सहल’ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक हळवा आणि संस्मरणीय अनुभव असतो. शैक्षणिक वर्षात विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांकडून सहली आयोजित केल्या जातात. या सहली एसटीच्या माध्यमातून आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात शासनाकडून ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे एसटीमार्फत आयोजित सहली सुरक्षित, विश्वासार्ह आणि माफक दरात उपलब्ध होतात. विशेषतः ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना याचा मोठा लाभ होतो.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या मागणीनुसार एसटी महामंडळाने तब्बल २५ हजार ५५८ बस फेऱ्या उपलब्ध करून दिल्या. या फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेटी देत सुरक्षित आणि सुखकर प्रवास केला. या उपक्रमातून महामंडळाला १२७ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ते मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक आहे.
यावर्षी बहुतांश शालेय सहलींसाठी एसटीने नव्या आणि अद्ययावत बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि समाधानकारक झाला.
भविष्यातही शालेय सहलींसाठी एसटी बसेस वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयांनी खाजगी बसेसऐवजी एसटी बसेसचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
School Trips Generate 127 Crore Revenue for MSRTC, Says Minister Pratap Sarnaik
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर