बेस्ट संपावर तातडीने तोडगा काढून नीट परीक्षार्थींना दिलासा द्या, माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या संपामध्ये तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी लेखी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संपावर त्वरित तोडगा काढला नाही, तर त्याचा फटका रविवारी, ( 21 जून) नीट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना होऊ शकेल, अशी चिंता शेवाळे यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. संप 21 जूनपर्यंत मिटला नाही, तर परिक्षार्थींसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याची विनंतीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.



शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बेस्ट उपक्रमातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे गुरुवार मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतुकीवर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यातच, येत्या रविवारी म्हणजे 21 जून रोजी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मुंबईतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बेस्ट बसवर अवलंबून असतात. मात्र, बेस्टचा संप लांबला, तर या विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.आधीच, पेपरफुटीमुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना, बेस्ट बसच्या संपामुळे ऐन परीक्षेच्या दिवशीच मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीती शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन, नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, बेस्ट संपामध्ये तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. तसेच, संपावर तोडगा न निघाल्यास, नीट परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

Best strike issue must be resolved urgently to provide relief to exam candidates, Rahul Shewale urges Chief Minister

 

महत्वाच्या बातम्या