छोटा चिंटू आणि चिकणी चमेली : नितेश राणे आणि संग्राम जगतापांना इम्तियाज जलील यांचा टोला

विशेष प्रतिनिधी

अहल्यानगर : धर्म धंदा झाला आहे, सुशिक्षितही सोशल मीडियाचे शिकार बनत आहेत अशी खंत व्यक्त करून 24 तास उलटत नाहीत तोच माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भडकाऊ भाषण करत टीकेची पातळी सोडली. छोटा चिंटू आणि चिकणी चमेली अशी टीका त्यांनी नितेश राणे आणि संग्राम जगतापांवर केली. Imtiaz Jalil

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या अहिल्यानगर दौऱ्यात एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वादग्रस्त भाषण केले. मुकुंदनगर येथील सी.आय.व्ही. ग्राउंडवर झालेल्या जाहीर सभेत जलील यांनी भाजप नेते व कॅबिनेटमंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कडक शब्दांत टीका केली.

खासदार इम्तियाज जलील म्हणाले, पोलिसांचे आमच्यावर एवढे प्रेम का आहे माहिती नाही, आम्ही आलो की पोलिसांकडून आमच्या हातात तीन तीन पानांचे प्रेम पत्र दिले जाते. त्या पत्रात लिहिलेले असते तुम्ही असे बोलू नका, हे करू नका. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार आजची सभा झाली. पण पोलिसांनी हे लक्षात ठेवावे, यापुढे नगर शहरात कोणत्याही स्टेजवर मुस्लिम विरोधात शिव्या दिल्या गेल्या तर आम्हाला पण उत्तर देता येते, असा इशारा जलील यांनी दिला आहे. Imtiaz Jalil



जलील म्हणाले, कोणीही उठते आणि मुस्लिमांना शिव्या देतात. राजकारण करायचे तर मुस्लिमांना शिव्या द्यायचा ही फॅशन झाली आहे. आधी छोटासा चिंटू (नितेश राणे) बोलायचा आता तुमच्या शहरात चिकणी चमेली (संग्राम जगताप) आली, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी दोन्ही नेत्यांना खोचक टोला लगावला आहे.

तुम्ही गाडीवरून जात असाल तर तुमच्या गाडीवर मागे कुत्रं लागते पण तुम्ही तुमचा प्रवास सुरु ठेवतात. कोणी म्हणत आमच्या मागे अजित पवार आहे, कुणी म्हणतं आमच्या मागे फडणवीस आहे, कुणी म्हणतं शिंदे आमच्या मागे आहेत. पण, या सगळ्यांना आम्ही सोडले नाही. आम्ही मोदीला सोडत नाही तू काय चीज आहे, चिल्लर, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी आमदार जगताप यांना दिला.

काही कुत्र्यांना पट्टा बांधला जातो, काहींना रस्त्यावर सोडले जाते, तर काही कुत्रे खुजलीवाले असतात. मी कुणाचेही नाव घेतलेले नाही, मीडियावाल्यांना काय चालवायचे ते चालवू द्या, असे म्हणत जलील यांनी नाव न घेता आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणुका येत असून दंगली पेटवत माहोल खराब केला जातो आहे, असे जलील यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हटले.

Imtiaz Jalil’s take on Nitesh Rane and Sangram Jagtap

महत्वाच्या बातम्या