विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी आज आपला पहिला दसरा मेळावा नगद नारायण गडावर घेतला. त्याला मराठा समाजातल्या लाखोंनी जोरदार प्रतिसाद दिला. मनोज जरांगे यांनी देखील जोरदार भाषण करून मराठा समाजाकडून काही आश्वासन घेत आपले नेतृत्व पुनर्स्थापित केले. पण त्याचवेळी मनोज जरांगे यांनी त्यांच्याकडे आलेल्या विधानसभेच्या इच्छुकांना मात्र आजही लटकवूनच ठेवले. कारण त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची प्रत्यक्षात कुठलीही राजकीय भूमिकाच उघडपणे जाहीर केली नाही.
मनोज जरांगे आपल्या भाषणात महायुतीविरुद्ध बोलले. त्यांनी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. 17 जातींचा ओबीसीमध्ये केंद्रीय सूचित समावेश करायला विरोध केला. पण मनोज जरांगे यांच्याकडे ज्या तब्बल 3500 विधानसभा निवडणूक इच्छुकांनी जे अर्ज केलेत त्यांच्या बाबतीत मात्र जरांगे यांनी कुठलाही निर्णय जाहीर केला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष घोषणेचा अवकाश असताना प्रत्येक राजकीय पक्षाने इच्छुकांकडून विशिष्ट रक्कम घेऊन अर्ज दाखल करून घेतले. त्यामध्ये मनोज जरंगे यांना सुरुवातीपासूनच प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्याकडे तब्बल 3500 युवकांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक म्हणून अर्ज केला. जरांगे यांच्या तुलनेत बाकीच्या नेत्यांना आणि पक्षांना फारच कमी प्रतिसाद मिळाला. काँग्रेसकडे 1600 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादीकडे 1200 अर्ज दाखल झाल्याची बातमी माध्यमांमध्ये आली. शिवसेनेने हा प्रयोग केला नाही, पण त्यांच्याही इच्छुकांची संख्या 1000 आसपास असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ मनोज जरांगे यांच्याकडे प्रस्थापित नसलेल्या युवकांनी मोठ्या संख्येने अर्ज करून जरांगे यांच्या इच्छेनुसार कुठल्यातरी पक्षातर्फे किंवा अपक्ष लढण्याची तयारी दाखविली.
मनोज जरांगे आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष निवडणूक लढविण्यासंदर्भात काही राजकीय घोषणा करतील, अशी या इच्छुकांची आणि त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या समर्थकांची अपेक्षा होती. किंबहुना या इच्छुकांनीच आपापले समर्थक मोठ मोठ्या गाड्या भरून नारायण गडावर आणल्याची बातमी माध्यमांनी चालवली होती. परंतु, प्रत्यक्षात मनोज जरांगे यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्यावर भर देण्यापेक्षा केवळ महायुतीवर विरुद्ध बोलणेच पसंत केले. त्यामुळे तब्बल 3500 इच्छुक आणि त्यांचे समर्थक यांना मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यात देखील राजकीय दृष्ट्या लटकवूनच ठेवले, अशी भावना जरांगे समर्थकांमध्ये तयार झाली.