विशेष प्रतिनिधी
अंतरवाली सराटी: राज्यात ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात त्याच मतदारसंघात उमेदवार उभे करायचे असा मोठा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला.
मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. जेथे निवडून येतील तेथेच उमेदवार उभे करूया. प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाची एक लाख मते आहेत. मात्र एका जातीच्या जीवावर मतदार निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी मी समीकरण जुळवतोय. जेथे उमेदवार देणार नाही तेथे जो पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देईल की तुमच्या मागण्या मान्य आहेत त्याला पाठिंबा द्यायचा. आपल्या विचारांचा असेल त्याला निवडून द्या.
जरांगे म्हणाले, उमेदवार उभे केले नाहीत तर भाजपवाले खुश होतील. नाही उभे केले तर महाविकास आघाडीवाले खुश होतील. जेथे एससी आणि एसटी उमेदवार असतील तेथे उमेदवार द्यायचे नाही असेही त्यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले, आता ज्यांना पाहिजे त्यांनी उमेदवारी अर्ज भरावा. पण कोणाची ताकद आहे, कोण निवडून येऊ शकतो हे पाहू. त्यानंतर इतरांनी अर्ज मागे घ्यावे लागतील असेही त्यांनी सांगितले.