मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, तत्काळ रुग्णालयात दाखल

विशेष प्रतिनिधी

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. नांदेडच्या दौऱ्यावर असताना अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत घुसण्याचा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकारला अल्टिमेटम दिले आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते राज्यभरातील मराठा समाजाच्या लोकांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत. हा मोर्चा एकदा मुंबईत आला तर काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. मात्र मोर्चाची तयारी करत असाताना दुसरीकडे नांदेडमध्ये त्यांची प्रकृती अचानकपणे खालावली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



मनोज जरांगे हे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि सरकारने सगेसोयऱ्यांबाबत काढलेला अध्यादेशही लागू करावा, अशी मागणी करत आहेत. सरकारने ऑगस्ट महिन्यापर्यंत या मागण्या पूर्ण कराव्यात, असा अल्टिमेटमही त्यांनी दिला होता.

मात्र सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणूनच ते 29 ऑगस्टला मुंबईत येणार आहेत. यावेळी मराठा समाजाचे हजारो लोकही मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. याच आंदोलनाच्या नियोजनासाठी जरांगे सध्या फिरत आहेत.

Manoj Jarange’s condition worsens, immediately admitted to hospital