विशेष प्रतिनिधी
मुंबई: आमच्या पक्षाचे नुकसान होत असतानाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जागा देण्याची भूमिका घेतली होती. शरद पवार आमच्यासोबत असावेत, ही केवळ पक्षाची नाही तर आघाडीतील सर्वांचीच भावना असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. Sanjay Raut
राजकीय तडजोडी करताना केवळ स्वार्थ न पाहता व्यापक राजकीय हिताचा विचार केला गेला, असे त्यांनी स्पष्ट केले. . यावेळी बोलताना संजय राऊत यांनी, आम्ही आमच्या हक्काच्या आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या ‘सीटिंग’ जागादेखील सोडल्या, असेही नमूद केले. या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटप, अंतर्गत समन्वय आणि भविष्यातील राजकीय भूमिका यावर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपकडून शिवसेनेवर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊत यांनी भाजपच्या राजकीय धोरणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जात असल्याचा आरोप केला. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तत्वं बाजूला ठेवली असून, पूर्वी ज्यांना भ्रष्टाचाराचे प्रतीक ठरवले होते, त्यांच्याशीच आज हातमिळवणी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत यांनी थेट नावं घेत भाजपच्या भूमिकेवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावर यापूर्वी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, याची आठवण करून देत राऊत म्हणाले की, आज त्याच नेत्यांसोबत भाजप सत्तेसाठी तडजोड करत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराबाबत भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचे स्पष्ट होते, असा टोला त्यांनी लगावला. एका बाजूला विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक जिंकण्यासाठी त्यांच्याशीच युती करायची, ही भाजपची सवय बनली असल्याचे त्यांनी नमूद केले. हे सर्व नेते एकाच राजकीय व्यवस्थेचे भाग असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
भाजप सत्तेत आल्यानंतर राज्यातील राजकीय संस्कृती बदलली असून, निवडणुकांमध्ये बंडखोरी वाढल्याचा आरोपही राऊत यांनी केला. पूर्वी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची संख्या मर्यादित होती, मात्र आता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी निर्माण झाल्या आहेत. असंतुष्ट नेत्यांना पर्याय उपलब्ध करून दिले जात असून, पैशाच्या जोरावर लोकांना फोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत बंडखोरी वाढत असून, राजकीय अस्थिरता निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर ठेवला. सत्तेचा गैरवापर करून राजकीय तोडफोड केली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
मुंबईतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उत्तर भारतीय मतदारांना लक्ष्य करण्यासाठी बाहेरील राज्यांतील नेत्यांना प्रचारासाठी आणले जात असल्यावरूनही संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारमधील नेते आणि अन्य राज्यांतील चेहरे मुंबईत प्रचारासाठी आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप मुंबईला दोन भागांत विभागत असल्याचे त्यांनी म्हटले, एक परप्रांतीयांसाठी आणि दुसरी मराठी माणसांसाठी. शिवसेनेसाठी मुंबई अखंड असून, प्रत्येक मुंबईकर एकसमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान करावे, असे आवाहन करत भाजपवर प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवादावर आधारित राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी थेट आव्हान दिले. मुंबईतील मतदार जर मुंबईकर असतील, तर त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील भाजप नेते का जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर भाजप इतकी सक्षम असेल, तर बाहेरील राज्यांतील मुख्यमंत्री, नेते प्रचारासाठी का बोलवावे लागत आहेत, असा सवालही त्यांनी केला. इतकी वर्षे मुंबई आणि महाराष्ट्रात सत्ता उपभोगूनही भाजपला स्थानिक नेतृत्वावर विश्वास नसल्याचे यावरून दिसते, असे राऊत म्हणाले. जिंकण्याच्या घोषणा करणाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वाच्या बळावर निवडणूक जिंकून दाखवावी, असे खुले आव्हान देत संजय राऊत यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
Sanjay Raut admits to giving seat to Sharad Pawar despite party’s losses
महत्वाच्या बातम्या
- विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुण्यात आपचा एकला चलोचा नारा; १६५ पैकी १६४ जागांवर उमेदवार
- दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे नाराज प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल