सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास आश्चर्य नको, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

पिंपरी : पवार काका आणि पुतण्या एकत्र आले म्हणजे त्यांचे विलीनीकरण झाले आहे. अजित पवारांच्या साथीने शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचे पहिले पाऊल टाकले आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यास सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा सुरू असताना पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, ही घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या राजकीय घडामोडीवरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच पिंपरीत एका बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनीही पवार-काका पुतण्यांवर टीका केली.

ते म्हणाले की, शरद पवार जे बोलतात, त्याच्या उलट कृती करतात. हे त्यांच्याबद्दल माझं मापदंड अगदी तंतोतंत खरे ठरलेले आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या, तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.



काँग्रेसने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पोटामध्ये राज ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे ज्या ज्या पक्षांसोबत युती करणार असतील त्यांच्यासोबत काँग्रेसने जाऊ नये. अन्यथा देशभरात त्यांचे अस्तित्व कमी होईल. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केली आहे, असेही आंबेडकर म्हणाले. तसेच, इतर महापालिकांमध्ये भाजप वगळून इतर पक्षांशी आघाडी करण्याचे सुरू असून ज्या ठिकाणी बोलणी फिस्कटतील त्याठिकाणी आम्ही स्वबळावर लढू, असेही ते म्हणाले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केली. इतर महापालिकांमध्ये भाजपवगळता इतर पक्षांशी आघाडी करण्याची चर्चा सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.

Supriya Sule becomes a minister at the Centre, claims Prakash Ambedkar

महत्वाच्या बातम्या