विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अडेलतट्टूपणाचे दर्शन घडवत सांगोला विधानसभा मतदारसंघातून परस्पर दीपक साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मशाल हाती घेऊन कुणाला चटके द्यायचे हे तुम्ही ठरवायचे आहे, असे दीपक साळुंखे यांना म्हणाले. मात्र हे चटके महायुतीला नव्हे तर महाविकास आघाडीलाच बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण यामुळे महाविकास आघाडीचा मित्र पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष दुखावला गेला आहे.
सावंतवाडीचे राजन तेली आणि सांगोल्याचे दीपक साळुंखे यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपल्या सर्वांचं मातोश्रीत आणि शिवसेनेत स्वागत करतो. दसऱ्यानंतर आज पहिल्या प्रथम तुमच्यात आलो आहे. मधल्या काळात हॉस्पिटलची वारी करावी लागली होती. डॉक्टर म्हणाले होते आराम करा. पण आता आराम करायचा तरी किती? आधी हराम्यांना घालवायचं आहे. आता आराम नाही. पण आज कामाला सुरुवात करण्याचा मुहूर्त चांगला लागला आहे. दीपकआबासारखा एक मजबूत गडी शिवसेनेत सामील होत आहे.
शिवसेना परिवारात सामील झालेले आहेत. आबा तुमच्या हातात मशाला दिलेली आहे. आता ही मशाला कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे? हे तुम्ही ठरवायचं आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.
ठाकरे म्हणाले, ही निवडणूक सोपी नाही. दिपक (आबा) आल्यानंतर विजय नक्की आहे, हे मला माहित आहे. विजय नक्कीच होणार आहे, मग मी सभेला आलोच नाही तर, मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही आजपासून संपूर्ण घराघरात ही मशाल पोहोचवली पाहिजे. हे गद्दार आहेत, हे नुसतेच गद्दार नाहीयत. तर बरेच खोके वगैरे घेऊन बसलेले आहेत.
धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम ते निर्माण करत आहेत. शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची निशाणी ही मशाल आहे. ही आत्तापासून तुम्हाला घराघरात न्यावी लागेल. मला खात्री आहे, विजय हा नक्की आहेच. उमेदवारी अजून कुणाचीच जाहीर केलेली नाही. फक्त दिपक आबांच्या हातात मशाल दिलेली आहे. मशालीची धग तुम्हाला दाखवून द्यायची आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.