विशेष प्रतिनिधी
मुंबई : पक्षात होत असलेल्या इनकमिंगने उद्धव ठाकरे हुरळून गेले आहेत. मतदार संघातील गणिते लक्षात न घेता प्रवेश द्यायला लागल्यामुळे महाविकास आघाडीचाच गेम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगोल्यात दीपक साळुंखे यांना उमेदवारीचा शब्द देऊन ठाकरेंनी इंडिया आघाडीत मोडता घालण्याची तयारी सुरू केली आहे. Uddhav Thackeray to Undermine Mahavikas Aghadi? Sangola Set to Repeat Sangli’s Scenario?
लोकसभा निवडणुकी वेळी सांगलीमध्ये पै.चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सांगलीची राजकीय गणिते लक्षात न घेता ठाकरेंनी पाटील यांच्या उमेदवारीसाठी हट्ट धरला. इंडिया आघाडीतील मोठ्या नेत्यांचेही ऐकले नाही. मात्र त्यामुळे इंडिया आघाडीच्या आणि ठाकरेंच्या उमेदवारावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली.
मात्र यातून उद्धव ठाकरे यांनी धडा घेतलेला नाही. विधानसभा निवडणुकीतही तोच कित्ता गिरवला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे आज दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. वास्तविक सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्ष लढविणार असल्याबद्दल कोणतीही शंका नाही. इंडिया आघाडीचे नेते शरद पवार यांनी तसा शब्द दिला आहे. मात्र आता साळुंखे ठाकरे गटात आल्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आडमुखी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी कामगार पक्ष रायगड व्यतिरिक्त महाराष्ट्रात केवळ हीच जागा मागत आहे. मात्र येथेही ठाकरेंचा आडमुठेपणा कायम राहिला तर रायगड जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो.
सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात ठाकरेंच्या सेनेतून दीपक आबा साळुंखे उतरणार मैदानात उतरणार आहेत.
गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांना तिकीट डावल्याने त्यांनी ऐनवेळी महायुतीचे शहाजीबापू पाटील यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत देशमुख यांच्या विरोधात शहाजी बापू हे केवळ 768 मतांनी विजयी झाले होते. आता दीपक साळुंखे यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे.